यवतमाळ : फेबु्रवारीचा अखेरचा दिवस आणि मार्चचा पहिला आठवडा रबीच्या हंगामासाठी सर्वाधिक घातक ठरला. दहा दिवसात तीन वेळा शेतकऱ्यांना निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागला. यात ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक आडवे झाले. निसर्ग प्रकोपाचा सामना करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. २८ फेबु्रवारी आणि १ व ९ मार्चला अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यामध्ये गहू, हरभरा, आणि भाजीपाला पिकांसह आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. दहा दिवसात ३३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षणानंतर अंतिम अहवाल सादर होणार आहे. ९ मार्चला सर्वाधिक २२ मिमी पावसाची नोंद दारव्हा तालुक्यात झाली. शेलोडीला याचा सर्वाधिक फटका बसला. यवतमाळात ६ मिमी, बाभुळगाव १० मिमी , कळंब १२ मिमी, आर्णी २ मिमी, दिग्रस २ मिमी, नेर ७ मिमी, पुसद ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बाभुळगाव तालुक्यातील २२ घरांची अंशता पडझड झाली. (शहर वार्ताहर)
३३ हजार हेक्टर पीक उद्ध्वस्त
By admin | Updated: March 11, 2015 01:56 IST