कळंब : आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यावर्षी शेती पिकणार की, नाही अशी विदारक परिस्थिती आहे. अशातच संत्राही हातचा गेल्यात जमा आहे. संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात गळाला आहे. हातात येणारे संत्रा पीक उद्ध्वस्त होतानाचे चित्र पाहावे लागण्याची दुर्देवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात भाजीपाल्यासह फळवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अनेक शेतकऱ्यांकडे संत्रा बागा आहे. परंतु यावेळेस आंबिया बहार डोळ्यादेखत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. फळांची गळती इतकी मोठी आहे की, अर्ध्यापेक्षा अधिक संत्रा पडलेला आहे. संत्र्याने लदबदलेली झाडे बोडखी झाली आहे. याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. फळगळती थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. परंतु पदरी निराशाच पडली. याचा फटका तालुक्यातील १२० पैकी ८० हेक्टरातील संत्राबागांना बसला. पर्यायाने २३ हजार झाडे क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे संत्रा बागाच्या नुकसानीचा सर्वे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी चंद्रशेखर चांदोरे, विजय वाके, विनोद पद्माकर काळे, अविनाश मेत्रे, माणिक वाके, रफीक शेख, संजय रावेकर, श्याम केवटे, श्याम बांते, मुरलीधर डेहनकर, सुनील बरडे, भास्कर महाजन, तुषार मेत्रे, डॉ.मोहन तुंडलवार, विलास खसाळे, मोहन उमरतकर, विशाल अजमिरे, पुनमचंद छल्लानी, त्र्यंबक वाके, काशिनाथ काळे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
संत्रा बागायतदार उद्ध्वस्त
By admin | Updated: August 27, 2014 23:53 IST