प्रवाशांची आबाळ : रेल्वे थांबत नसल्याने पुण्या-मुंबईत शिकणाऱ्यांची कोंडीवणी : परिसरात कोळशाच्या एकूण १२ खाणी आहेत. येथील कोळशापासून शासनाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. मात्र येथे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची कोंडी होत आहे.वणी रेल्वे सायडींग, राजूर येथील रेल्वे सायडींगवरून रेल्वेने रात्रं-दिवस कोळशाची वाहतूक केली जाते. दररोज कोट्यवधी रूपयांचा कोळसा येथून बाहेर नेला जातो. दररोज येथून रेल्वे रॅक कोळसा भरून नेली जाते. दररोज रॅक भरून नेल्यास ४० लाखांचे उत्पन्न मिळते. अर्थात महिन्याला १२ कोटींचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र येथील रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोळसा नेण्यासाठी येथे दूरवरून रेल्वे गाड्या येतात. मात्र या रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने वणीकर अजूनही रेल्वेच्या प्रवासापासून वंचित आहे. येथील रेल्वे स्थानकातून धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस, नांदेड एक्सप्रेस, पुणा-पाटणा-पुणा एक्सप्रेस या साप्ताहिक रेल्वे एक्सप्रेस धावतात. मात्र येथे थांबतच नाही. वणी व परिसरातील अनेक विद्यार्थी पुणे, कोल्हापूर, नाशिक, शेगाव व इतर ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जातात. मात्र त्यांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. कारण येथे एक्सप्रेस थांबत नाही. केवळ नागपूर-मुंमई नंदिग्राम एक्सप्रेसाचा येथे थांबा आहे. ती रेल्वे त्यांना प्रवासासाठी योग्य नाही. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना नाईलाजाने दुसऱ्या ठिकाणी जाऊन रेल्वेने प्रवास करावा लागतो. या एक्सप्रेसचा वणीत थांबा नसल्यामुळे विद्यार्थी कमालीचे वैतागले आहेत. वणी परिसरात चुना उद्योग, कोल वॉशरी, सिमेंट, डोलोमाईट उद्योग व कोळशाच्या खाणी आहेत. या उद्योगातील लोकांची पाळेमुळे उत्तरप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये रूजली आहे. तेथील कामगार, अधिकारी मोठ्या प्रमाणात या परिसरात वास्तव्याला आहेत. अनेक व्यापारीही कोळसा खरेदीसाठी रेल्वेने माजरी येथे येतात व तेथून दुसऱ्या वाहनाने वणीला पोहोचतात. तालुक्यातील कोळसा खाणी शासनाला कोट्यवधीेंचे उत्पन्न मिळवून देतात. मात्र शासन रेल्वे एक्सप्रेसचा एकही मिनिटांचा थांबा येथे देऊ शकत नाही. चंद्रपूरवरून मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या नागपूरला जातात. त्या वर्धा व सेवाग्राममध्ये थांबतात. परंतु अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरील हिंगणघाटला थांबत नव्हत्या. त्यासाठी तेथील प्रवासी संघटनेने मोठे आंदोलन उभारले होते. त्यांना तेथील तत्कालीन आमदार व खासदारांनी सहकार्य केले. त्यानंतर हिंगणघाटला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ वणी येथेच एकमेव रेल्वे स्टेशन आहे. परंतु तेथेही एक्सप्रेस गाड्यांचा थांबा नसल्याने या रेल्वे स्टेशनचा उपयोग तरी काय, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहे.आता केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे येथे थांबा देण्यासाठी या परिसराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रयत्न केल्यास रेल्वेचा थांबा मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना रेल्वे थांबा मिळून या परिसराला ‘अच्छे दिन’ येईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)खासदारांचे आश्वासन हवेतच विरलेतत्कालीन खासदार हंसराज अहीर यांनी अनेकदा वणीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या मार्गाने धावणाऱ्या रेल्वे एक्स्प्रेस लवकरच वणीत थांबतील, अशी ग्वाही दिली होती. मात्र अद्याप त्या येथे थांबतच नाही. त्यामुळे त्यांचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसत आहे. आता ते केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी रेल्वे थांब्यासाठी जोर लावावा, अशी प्रवाशांची इच्छा आहे. त्यांनी चंद्रपूर-वणी-नांदेड-मुंबई रेल्वे सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिरवा कंदीलही दाखविला होता. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदनही सादर केले होते. मात्र अद्याप ती गाडीही सुरू झालीच नाही.
खाणी असूनही रेल्वे थांबा नाही
By admin | Updated: July 21, 2015 01:47 IST