छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण यवतमाळ : भारतात यापूर्वी अनेक हिंदू राजे होऊन गेलेत; पण त्यांची चर्चा होत नाही. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींसाठी राज्य केले, म्हणून महाराजांची दखल घेतली जाते. या क्रांतीकारक राजाने येथील व्यवस्था बदलल्यामुळे रयतेचे राज्य आले. याचा खरा इतिहास लिहणाऱ्यांना गोळ््या आणि खोटा इतिहास लिहणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे या राज्यात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसन्मान जागर परिषदेतून येथे दिला. छत्रपती शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृती समितीच्या वतीने येथील संदीप मंगल कार्यालयात रविवारी दुपारी आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, लेखिका प्रतिमा परदेसी, संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष मनोज आखरे, देवानंद पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर, डॉ. दिलीप महाले, पप्पू भोयर उपस्थित होते. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचे स्थान आमच्या हृदयात आहे. त्यापेक्षाही काकणभर जास्त सन्मान आम्ही राजमाता जिजाऊंना देतो. आमच्या आईबद्दल विकृत लिहणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, त्यांचे लग्न करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि जिजाऊंचा घरखर्च या सर्व बाबी दादोजी सांभाळीत होते, असे लिहून शहाजी राजांना निष्क्रिय दाखवून बदनामी करणारे विकृत लेखन केले आहे. याबाबतचे पुरावे मागितले असता, ते देण्यात अपयशी ठरल्यामुळे पुणे येथील अॅड़ अनंत दारव्हटकर, कोल्हापूर येथील डॉ. राजीव चव्हाण यांनी ब. मो. पुरंदरे यांच्यावर एक कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात जेम्स लेन या विदेशी लेखकाने पुण्यात येऊन शिवाजी महाराज आणि जिजाऊंची बदनामी केली. त्यालासुद्धा पुरंदरेंनी संदर्भ पुरविले. त्यामधून जातीयवाद व हिंदू-मुस्लिम द्वेष वाढण्यास मदत झाली. शिवजयंतीचा वाद निर्माण करण्यास पुरंदरे कारणीभूत आहेत. अशा माणसाच्या विकृत इतिहासाकडे कानाडोळा करून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हा आपला सर्वांचा अवमान आहे. विचारांचा हा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावेळी श्रीमंत कोकाटे, मनोज आखरे, प्रतिमा परदेशी यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या आयोजनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय होता. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2015 01:28 IST