अकोलाबाजार : येथील विदर्भ कोकण ग्रामणी बँकेच्या व्यवस्थापकाच्या मनमानीने अनेक शेतकरी पीक कर्जाच्या पुनर्गठनापासून वंचित आहेत. सोमवारी पीक कर्जासाठी या बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावे, त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी राज्य शासनाकडून कठोर निर्देश देण्यात आले आहेत. खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी बँक व्यवस्थापकांना कर्ज पुनर्गठनासाठी १५ जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. मात्र येथील विदर्भ कोकण बँक शाखेच्या व्यवस्थापकाने कर्ज पुनर्गठन केले नाही. त्यामुळे परिसरातील शंभरावर शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. अशा स्थितीत वेळेवर पेरणी कशी करायची असा प्रश्न ललिता आडे या शेतकरी महिलेने उपस्थित केला आहे. बँक व्यवस्थापकाकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)
ग्रामीण बँकेचा कर्ज पुनर्गठनास नकार
By admin | Updated: June 16, 2015 01:45 IST