यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागाचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. वरिष्ठांचे आदेशही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जात नाही. एवढेच नव्हे तर कार्यकारी अभियंत्यांकडून सहकारी वादग्रस्त अधिकाऱ्यांची पाठराखण केली जाते. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच या अधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. मात्र ज्यांच्याकडे हा पदभार देण्याचे आदेश आहे, त्या अधिकाऱ्यानेही पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. या प्रकारात जनतेचे मात्र हाल होत आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा सुरळीत आणि नियमित व्हावा यासाठीची जबाबदारी उपविभागीय अभियंत्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र या अधिकाऱ्याकडून ही जबाबदारी पार पाडली जात नाही. प्राधिकरणावर एप्रिल आणि मे महिन्यात हजारो नागरिक धडकले. नियोजन आणि समन्वयाअभावी निर्माण झालेली परिस्थिती प्राधिकरणाच्या ठाणे येथील मुख्य अभियंत्यापर्यंत पोहोचली. त्यांनी दिलेल्या आदेशावरून अधीक्षक अभियंत्यांनी उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, येथील कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. एवढेच नव्हे तर यवतमाळचा पाणीप्रश्न मिटला असून मोर्चेही थांबल्याचे मुख्य अभियंत्यांना एका पत्राद्वारे कळविले होते. वास्तविक आजही यवतमाळकरांना अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्य अभियंत्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी ९ जून रोजी येथील कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क करून दारव्हेकर यांचा कार्यभार काढण्याचे आदेश दिले. यावरून कार्यकारी अभियंत्यांनी दारव्हेकर यांनी आपला कार्यभार उपकार्यकारी अभियंता डी.एस. देशकर यांच्याकडे द्यावा, असा आदेश येथील कार्यकारी अभियंत्यांनी काढला. मात्र दारव्हेकर यांनी कार्यभार सोडला नाही तर देशकर यांनीही स्वीकारला नाही. यावरून सदर कार्यालयाचे अधिकारी वरिष्ठांचा आदेशही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. यात मात्र शहरातील जनता भरडली जात आहे. आता तिसऱ्याकडे जबाबदारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)
प्राधिकरणाच्या वादग्रस्त अभियंत्याला हटविले
By admin | Updated: June 18, 2014 00:27 IST