यवतमाळ : महाराष्ट्रात मुबलक पाऊस होतो. यानंतरही पावसाळा संपताच टँकरची मदत घ्यावी लागते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. मुळात राज्यात पाण्याच्या योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. पावसाशी निगडित पिकपध्दतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्र सिंग (राजस्थान) यांनी केले.लोकजागृती मंचच्यावतीने येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित जलसंवाद कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. माजीमंत्री वसंत पुरके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर, जलव्यस्थापन वाल्मीचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, उपविभागीय अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य तथा लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आदींची मंचावर उपस्थिती होती.राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, राज्यस्थानातील सात नद्या जिवंत करण्यासाठी ३२ वर्षांचा कालखंड लागला. यानंतर या ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात पाणी टंचाईची तिव्रता काहीच नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष या बाबीला कारणीभूत आहे. आपल्याला नद्या जिवंत ठेवायच्या असतील तर, लहान नाले जिवंत करावे लागेल. त्या खेरीज बारमाही पाणी मिळनार नाही. देशभरातील पाण्याच्या संचयाच्या तुलनेत राज्यात ४० टक्के पाणी आहे. यानंतरही पाण्यासाठी भटकंती होते. शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करून पाण्याची साक्षरता राबविण्याची नितांत गरज आहे. तरच पुढील काळात चित्र बदलेल. त्यामुळे आजच सावध होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.सुरेश खानापूरकर म्हणाले, आज असलेले लातुरचे चित्र पुढे अनेक जिल्ह्यात दिसू शकते. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यासोबत सुजलाम सुफलाम करण्यासाठी ३० हजार कोटी द्या, शिरपूर पॅटर्न राबवून चित्र बदलवून दाखविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज मोठ्या धरणाची नव्हे तर, छोट्या नाल्यांवर बांध घालण्याची आवश्यकता आहे. यामुळे पाणी रिचार्ज होवून पातळी वाढेल. सध्या पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. पाण्याचे पुनर्भरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर त्यांनी चिंता व्यक्त केली. माथा ते पायथा धोरण राबविल्यास क्रांती घडेल असे ते म्हणाले. संचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक शैलेश इंगोले होते. या कार्यक्रमाला नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)
राज्यात पावसाशी निगडित पीक पद्धती काळाची गरज
By admin | Updated: May 9, 2016 02:26 IST