खरडगावची घटना : पैसे देण्यास टाळाटाळ नेर : विकलेल्या सोयाबीनचे पैसे देण्यास टाळाटाळ आणि पैशासाठी दिलेला धनादेशही बनावट निघाल्याने एका शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्याप्रकरणी नेर पोलिसांनी तीन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर शेतकऱ्याने १४ आॅक्टोबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्व चिठ्ठी आणि मुलाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.विलास लक्ष्मण गिरुळकर (५५) रा. खरडगाव ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर गजानन रामहरी बोरकर, सुरेश रामहरी बोरकर, दिलीप रामहरी बोरकर रा. वाढोणा रामनाथ ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहे. आरोपी तिघेही भाऊ आहेत. विलास गिरुळकर यांची खळणा शिवारात तीन एकर शेती आहे. दहा एकर शेती मक्ताबटाईने करीत होते. २०१३ मध्ये त्यांनी दोन लाख रुपयांचे सोयाबीन पिकविले. ते सोयाबीन वाढोणा रामनाथ येथील बोरकर बंधूंना विकले. सोयाबीनचे पैसे एक महिन्याने देण्याची बोलणी केली. त्यानंतर तब्बल सहा महिने चकरा मारुनही व्यापाऱ्यांनी विलासला पैसे दिले नाही. अधिक तगादा लावल्याने या व्यापाऱ्यांनी विलासला वाढोणा बँकेचा धनादेश दिला. परंत धनादेश देताना बँकेत टाकू नका असा सल्ला दिला. यातच धनादेशाची मुदत संपली. यामुळे शेतकरी मानसिक तणावात आला. त्यातच सुरेश बोरकर नामक व्यापारी गुजरातला निघून गेला. यामुळे धास्तावलेल्या विलासने १३ आॅक्टोबर २०१५ रोजी विष घेतले. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. मात्र विलासने ठाणेदाराच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात व्यापाऱ्याने सोयाबीनचे पैसे दिले नाही. मुलीच्या लग्नाची तजवीज कशी करावी या विवंचनेत आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. मुलगा धीरज गिरुळकर याने दिलेल्या तक्रारीवरून तीन व्यापाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नेर पोलिसांनी दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश इंगळे यांच्या मार्गदर्शनात जमादार जीवन राठोड करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्याच्या आत्महत्येत तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा
By admin | Updated: October 29, 2015 02:47 IST