जिल्हाधिकारी : राळेगाव येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळाराळेगाव : शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणे ग्रामीण भागातील जनतेची, शेतकऱ्यांनी कामे करा. चांगले काम करणाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात येईल. मात्र चुकीचे काम करणाऱ्यांना वठणीवर आणले जाईल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. राळेगाव उपविभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा येथे शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह राळेगाव व कळंब तालुक्यातील तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक जीवनात वावरताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आचरण आदर्श असावे असे जिल्हाधिकारी म्हणाले. विविध शासकीय योजना प्रथम पूर्णपणे समजून घ्या. त्याची माहिती शेतकरी, मजुरांना घरोघरी जाऊन द्या. शासनाच्या विविध योजनात ग्रामपातळीवर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचे चित्र बदलविण्याचे आव्हान स्वीकारा असे त्यांनी सांगितले. जनेतचे सेवक म्हणून काम करा, असा हितोपदेश त्यांनी दिला. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या भेटण्याचा दिवस, वेळ आणि त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा फलक लावा. ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यास ग्रामपातळीवर काम करणाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी अन्नसुरक्षा योजनेची प्रभावी अमलबजावणी, सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची अमलबजावणी करण्यावर भर देऊन विविध यंत्रणेने समन्वयातून प्रभावी परिणाम दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी महाजन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग आदींनी आपापल्या विभागांच्या योजनांची माहिती पीपीपीव्दारे दिली. कार्यशाळेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. दरम्यान, वेणूताई बबन सरोदे या शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचा धनादेश दिला. (तालुका प्रतिनिधी)
कर्तृत्वाचा गौरवच होईल
By admin | Updated: July 13, 2015 00:15 IST