पुसदमध्ये कापसाचा ट्रक पेटला... १०० टन कापूस गाठी घेऊन दमनकडे निघालेला ट्रक काही काळ पुसद शहरात थांबला असता मंगळवारी दुपारी या ट्रकने अचानक पेट घेतला. संपूर्ण कापूस गाठी जळून खाक झाल्या. तर ट्रकचीही राखरांगोळी झाली. प्रचंड वाढलेल्या उन्हामुळे आग झपाट्याने पसरली. नगरपरिषदेचा अग्नीशमन बंब पोहोचण्यापूर्वीच २३ लाखांच्या मुद्देमालाची राखरांगोळी झाली.
पुसदमध्ये कापूस गाठींचा ट्रक खाकउष्णतेमुळे घेतला पेट : २३ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसानपुसद : कापूस गाठींनी खचाखच भरलेला ट्रक भररस्त्यावर पेटला. प्रचंड तापमानामुळे कापसाने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक इटावा वॉर्डात घडलेल्या या घटनेत २३ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळा (ता.आर्णी) येथील वैभव हाऊस गोडावूनमधून हा ट्रक (एम.एच.२९/पी-१५१२) सोमवारी १०० टन कापसाच्या गाठी घेऊन दमन येथील आलोक इंडस्ट्रीज सिलवासा येथे निघाला होता. दरम्यान, ट्रकचालक पुसद येथील असल्याने त्याने घराच्या परिसरात ट्रक उभा करून घरी मुक्काम केला. मंगळवारी दुपारी तो पुढच्या प्रवासाला जाणार होता. दरम्यान, १२.३० च्या सुमारास उन्हाच्या तडाख्यात गठानींच्या स्टिल पॅकिंगचे घर्षण होवून कापसाने पेट घेतला. काही कळायच्या आत संपूर्ण गठानी (किंमत १७ लाख १० हजार) व ट्रक जळून खाक झाला. हा ट्रक अशफाकोद्दिन अयनुद्दिन रा.खतिब वॉर्ड पुसद यांचा असून चालकाचे नाव गजानन दुपारते रा.इटावा वॉर्ड पुसद असे आहे.हा कापूस मनजित कॉटन गुंज यांनी विकत घेऊन त्याचा सौदा आलोक इंडस्ट्रीज सिलवासा यांच्याशी झाला होता. ही डिलीवरी देण्यासाठीच हा ट्रक निघाला होता. आगीची माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेचा अग्नीशमन बंब पोहोचला. मात्र तोवर उशीर झाला होता. या प्रकरणात वृत्त लिहिस्तोवर पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)