किशोर वंजारी - नेरएकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघातील नेर तालुक्यात या पक्षाची दैना झाली आहे. अंतर्गत गटबाजीने हा पक्ष खिळखिळा झाला आहे. पोटभरू कार्यकर्त्यांचीही गर्दी वाढल्याने ते पक्षासाठी बदनामीचे धन ठरत आहे. त्याच त्या लोकांना वारंवार पद दिल्याने निष्ठावानही दूर गेला आहे. ही परिस्थिती सावरण्यात तालुक्यातील अथवा राज्य पातळीवरील नेत्यांना अजूनही यश आलेले नाही. परिणामी काँग्रेसची या तालुक्यावरील पकड सैल झाली आहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मतदारसंघातील हा तालुका आहे. त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांचा जिल्हा परिषद मतदारसंघही याच तालुक्यातील वटफळी हा आहे. मात्र या दोघांनीही तालुक्यातील विस्कटलेली घडी बसविण्याचा फारसा प्रयत्न केलेला नाही. केवळ निवडणुका तोंडावर आल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न तेवढा होतो. आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही याचीच प्रचिती येत आहे. काँग्रेसच्या वाट्यातून या तालुक्याला विकासाच्या बाबतीत फार काही मिळालेले नाही. त्यामुळेच सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थेत या पक्षाला सपाटून मार खावा लागला. कार्यकर्त्यांची मोठी फळी या पक्षातून दूर गेली. जे काही जवळ आहे त्यांनीही आता पक्षाचे लेबल वापरून कुणाची बदली, कुणाला विहीर, कोणाला योजनेचा लाभ मिळवून देण्याचे सांगत पाच-पन्नास रुपये मिळतील या उद्देशाने काम सुरू केले आहे. ही बाब पक्षातील ज्येष्ठ लोकांना माहीत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या व्यक्तीला पद देताना त्याचा परिसरात किती प्रभाव आहे, याची चाचपणीही कधी केली गेली नाही. जुना माणूस तेवढी उपलब्धी पाहून जबाबदारी सोपविण्यात आली. या प्रकाराने धडाडीचा कार्यकर्ता मागे राहिला. आपण कुठपर्यंत सतरंज्याच उचलायच्या अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. अशाच पद्धतीने कार्यकर्ते दूर गेले. गटबाजीने काँग्रेसला पोखरल्याची प्रचितीही नुकत्याच झालेल्या बाजार समिती प्रशासक नियुक्तीत आली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी सादर केलेल्या दोन वेगवेगळ्या याद्या हे त्याचेच उदाहरण आहे. या बाबींचा काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेरमध्ये काँग्रेसची दैना
By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST