कळंब : धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार घटनाबाह्य आहे. असे असले तरी, अनेक काँग्रेस व राष्ट्रवादीची नेतेमंडळी धनगर समाजाला आरक्षणाची मागणी लाऊन धरत आहे. एवढेच नाही तर, विधानसभा आणि विधानसभेबाहेरही गदारोळ व नाट्य केले जात आहे. हा प्रकार सहनशीलतेपुढे गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच पुतळे जाळणार, असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले. दत्तापूर(निरंजन माहूर) येथे क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षातील नेत्यांविरुध्द त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी मात्र त्यांची वाहवा केली. आदिवासींचे आरक्षण धनगर समाजाच्या वाट्याला गेल्यास हा समाज आदिवासींसाठी घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आदिवासींनी आपला मूलभूत हक्क सोडता कामा नये. यासाठी जे काही करता येईल, ते एकत्र येऊन केले पाहिजे, असे प्रा.पुरके म्हणाले.माजी कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील ऐवढेच नाही, तर आमच्या पक्षाचे असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी नेते मंडळीही धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे या नेत्यांचेच पुतळे जाळावे लागणार आहे, असे सांगून त्यांनी या नेत्यांवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणात सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांचा साधा उल्लेखही नव्हता. यासंदर्भात प्रा.पुरके यांच्याशी संपर्क केला असता आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेस-राकाँ नेत्यांचे पुतळे जाळणार
By admin | Updated: August 2, 2015 02:26 IST