सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ : कुणालाच इन्टरेस्ट नाही, सर्वच कोमात, नेत्यांच्या गटबाजीचा फटका राजेश निस्ताने यवतमाळ काँग्रेस पक्षाने आपली सदस्य नोंदणी जिल्हाभर सुरू केली असली तरी त्याला जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तब्बल तिसऱ्यांदा या नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे. यावरून काँग्रेस पक्षात किती मरगळ आली हे दिसून येते. गेली १५ वर्ष केंद्र व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत ही दोनही सरकारे जनतेने उद्ध्वस्त केली. यवतमाळसह महाराष्ट्रात काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर आता तब्बल सहा महिन्याने काँग्रेसने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी खुद्द राहुल गांधी ठिकठिकाणी दौरा करीत आहे. काँग्रेसने पुन्हा सदस्य नोंदणी सुरु केली आहे. मात्र या नोंदणीला जिल्ह्यातील जनतेतून प्रतिसादच नाही. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सदस्य नोंदणी व्हावी म्हणून जोमाने प्रयत्न करताना दिसत नाहीत. जेथे कुठे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहे तेथे जनतेचा या नोंदणीला कोणताच प्रतिसाद नाही. काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी सदस्य नोंदणीसाठी नेलेल्या पावती पुस्तकांचा अद्याप जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात परतावा झालेला नाही. अनेकांच्या तर पावत्याही फाटल्या नसल्याची माहिती आहे. या सदस्य नोंदणीसाठी सुरुवातीला २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ देत १५ मे ही तारीख ठरविली गेली. मात्र ही तारीख जाऊनही सदस्य नोंदणीचे अपेक्षित उद्दीष्ट पूर्ण होत नसल्याचे पाहून आता तिसऱ्यांदा या नोंदणीला महिनाभराची मुदतवाढ दिली गेली आहे. १५ जून ही सदस्य नोंदणीची अंतिम तारीख राहणार असल्याचे पत्र काँग्रेसचे प्रवक्ते तथा अखिल भारतीय महासचिव जनार्दन द्विवेदी यांच्याकडून जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांवर पर्यायाने पक्षावर मरगळ आल्याने सध्यातरी कुणीही काँग्रेसमध्ये येण्यास, सदस्य होण्यास तयार नसल्याचे विदारक चित्र जिल्हाभर पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद न मिळण्यामागे नेत्यांमधील गटबाजी हेसुद्धा एक प्रमुख कारण पुढे आले आहे. नेत्यांमध्ये एकजुट नाही, प्रत्येक जण एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न आहे. त्यामुळे कार्यकर्तेही विखुरलेले आहेत. त्याचा परिणाम काँग्रेसच्या सदस्य नोंदणीवर होताना दिसतो आहे. केवळ बंदद्वार भाषणे, आक्रमक आंदोलनांचा पत्ताच नाहीकेंद्रात व राज्यात भाजपा आघाडीचे सरकार असल्याने काँग्रेसवर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका वठविण्याची मोठी जबाबदारी आली आहे. मात्र काँग्रेसचे नेते अद्यापही पक्ष कार्यालयात बसून आपल्याच परंपरागत कार्यकर्त्यांपुढे केवळ भाषणे ठोकण्यात आणि त्यांनाच पक्षाची महती सांगण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. दिल्ली-मुंबईतील क्षुल्लक बाबींवर पक्षाच्या स्थानिक बैठकीत अभिनंदनाचे ठराव घेणे यापुढे हे नेते सरकण्यास तयार नाहीत. प्रत्यक्षात काँग्रेसकडून जनतेला आक्रमक आंदोलनांची अपेक्षा आहे. मात्र काँग्रेसने सत्ता गेल्यानंतर एकही लक्षवेधी आंदोलन केलेले नाही. आतापर्यंत त्यांनी केलेली आंदोलने ही पोस्टर-बॅनर आणि फोटो पुरतीच मर्यादित राहिली आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने एकही मोठे आंदोलन जिल्ह्यात उभारलेले नाही. त्यातच संसदेत भाषण करताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोएडा, पुणे, मुंबई या सारख्या मेट्रो सीटीला लागून असलेल्या शेतीबाबत पुळका दाखविल्याने आधीच सामान्य शेतकरी नाराज आहेत. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्यांचा काँग्रेसच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. मुळात काँग्रेसकडे आक्रमक आंदोलनांचा दीर्घ अनुभव असलेला नेताच नाही. किमान नव्या जिल्हाध्यक्षपदी तरी अशी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याचा शोध घेतला जावा, ही रास्त अपेक्षा पक्षाचे निष्ठावंत सामान्य कार्यकर्ते ठेऊन आहेत. मात्र नेते मंडळी अद्यापही त्या मानसिकतेत नाही. मंत्री-आमदार राहिलेल्या नेत्यांच्याच गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडावी म्हणून प्रयत्न सुरू आहे. सामान्य कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद देण्याची अद्यापही या नेत्यांची मानसिकता दिसत नाही. सध्या जिल्ह्यात शिवसेनाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरत असल्याचे त्यांच्या ‘प्रशासकीय बॅटींग’वरून दिसून येते.
काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला ‘नो-रिस्पॉन्स’
By admin | Updated: May 17, 2015 00:20 IST