दिग्रस : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा फड गावागावांत रंगला असून पावसाच्या सरी बरसल्याने मरगळ झटकून सर्वच जण प्रचाराच्या कामात दिसत आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक होत असून या गावांमध्ये रणधुमाळी सुरू आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसले तरी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, एमआयएम आदी पक्षांनी कार्यकर्त्यांचे पॅनल बनवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. लाख रायाजी येथील निवडणूक अविरोध झाली असली, तरी इतर ग्रामपंचायतीमध्ये बहुरंगी लढत होत आहे. काही ठिकाणी तर शिवसेनेचे दोन गट एकमेकांविरोधात ठाकले आहे. आरंभी-वडगाव, बेलोरा, देऊरवाडा पुनर्वसन, धानोरा बु., वरंदळी, झिरपूरवाडी, साखरी-कोलुरा, रामनगर, कळसा-चिंचोली खुर्द, सावंगा खुर्द-जोगलदरी-फुलवाडी, सिंगद, खंडापूर, हरसूल-गांधीनगर, धानोरा-दाभा, विठाळा, मरसूळ, रुईतलाव, काटी, चिरकुटा, कलगाव, शिवणी, तिवरी, पेळू, मोख, खेकडी-मोरखेड-रामगाव, इसापूर या ठिकाणी सार्वत्रिक तर वसंतपूर खर्डा आणि चिंचोली क्र. १ येथे पोटनिवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत २२ पैकी १८ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला भगवा फडकाविला होता. आता २७ पैकी किती ग्रामपंचायतीवर त्यांना यश मिळते हे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे अनेक गावात शिवसेनेचेच दोन गट आमने-सामने उभे ठाकले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेसुद्धा पॅनल तयार केले असून या निवडणुकीने ग्रामीण वातावरण चांगलेच तापले आहे. (प्रतिनिधी)
गावागावांत रंगलाय राजकीय फड
By admin | Updated: July 22, 2015 00:17 IST