यवतमाळ : आपल्या धडाकेबाज शैलीने प्रशासकीय यंत्रणेला शिस्त लावल्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह शहराला शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर उतरले. गुरुवारी तब्बल दोन तास शहराचा फेरफटका मारून त्यांनी नगरपरिषद यंत्रणेसह व्यापारी आणि नागरिकांना सूचना दिल्या. दुकानासमोरील शेडचे अतिक्रमण, अतिक्रमित दुकाने आणि रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह गुरुवारी सकाळी ८ वाजता दत्त चौक परिसरात दाखल झाले. त्यांच्या सोबत नगर परिषद आणि महसूल विभागाची यंत्रणाही होती. यावेळी त्यांनी संतसेना चौक ते जाजू चौक परिसरात रस्त्यावर भरणारा भाजीबाजार अनुभवला. रस्त्यावर भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जिल्हाधिकाऱ्यांनी हा भाजीबाजार तत्काळ नियोजित जागी भरविण्याचे निर्देश दिले. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानासमोर कचराकुंडी ठेवावी, नागरिकांनीसुद्धा सहकार्य करीत कचराकुंडीतच कचरा टाकावा असे निर्देश दिले. नागरिकांच्या सहकार्याशिवाय शहर स्वच्छ राहणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आठवडीबाजार परिसरात वळविला. त्या ठिकाणी त्यांनी मटन, चिकन आणि मासोळी बाजाराची पाहणी केली. फळाच्या मार्केट संदर्भातही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांना निर्देश दिले. त्यानंतर कळंब चौक, महात्मा फुले चौक परिसराची पाहणी केली. कळंब चौकात दुकानांचे अतिक्रमण आढळून आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता रमजान महिना सुरू असल्याने तात्पुरते अतिक्रमण असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे अतिक्रमण रमजान संपताच निघाले पाहिजे, अशी तंबी त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना दिली. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करीत दुकानासमोर लावलेले ओटे, शेड काढून टाकावे, भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर बाजार न भरविता मार्केटमध्ये दिलेल्या जागेत बसून व्यवसाय करावा, अशी सूचना दिली. ज्यांनी अतिक्रमण केले त्यांनी ते स्वत:च तातडीने काढून टाकण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, नगर अभियंता रावसाहेब पालकर, महेश जोशी, डॉ. विजय अग्रवाल उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
By admin | Updated: June 26, 2015 02:24 IST