अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळअक्षरश: मृत्यूलाही वाकुल्या दाखविणाऱ्या शारीरिक कसरती म्हणजे सर्कस. दोन तासांचा हा खेळ सादर करण्यासाठी रोज दीडदोनशे माणसं राबतात. पण तो खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक असतात उणेपुरे २५ ! २०० जणांचा जत्था जगविणारी ‘अमर’ सर्कस हळूहळू आपले अमरत्व गमावू लागल्याचे दु:खद वास्तव आहे. सध्या यवतमाळात आलेल्या अमर सर्कसचीच नव्हे तर एकंदर देशभरातील सर्कशींचीच ही अवस्था आहे. अनेक अडचणींचा सामना करत सर्कस या कलाप्रकाराची वाटचाल कायम आहे. पण प्रेक्षकांनीच या प्रकाराकडे पाठ फिरविल्यामुळे सर्कशीचे भवितव्य धोक्यात आले आहे. मात्र सर्कस करणाऱ्या कलावंतांना दोन तासांचा खेळ सादर करण्यासाठी अक्षरश: जिवाची बाजी लावावी लागते. सर्कशीच्या तंबूत आणि तंबूबाहेरही पदोपदी अडवणूक, अवहेलना त्यांच्या वाट्याला येत आहे. सर्कशीमागची ही सर्कस खरे म्हणजे जीवनाचीच सर्कस बनली आहे.धामणगाव रोडवर सध्या अमर सर्कसचा डेरा पडला आहे. चंद्रपूरमध्ये पंधरा दिवसांचा मुक्काम करून ही सर्कस यवतमाळात आली. पण येतानाच जागेची अडचण. शहरातील पोस्टल ग्राऊंड, आझाद मैदानसारखे मध्यवर्ती ठिकाण मिळविण्याचा प्रयत्न झाला. पण जमले नाही. अखेर वेशीबाहेर धामणगाव रोडवर तंबू ठोकावा लागला. आता घराजवळच्या दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यक्रमालाही नाक मुरडणारे नागरिक एवढ्या लांबच्या सर्कशीला कसे जातील? सर्कशीचा प्रत्येक खेळ रिकाम्या बाकांनाच बघावा लागत आहे. चार-पाचशेची क्षमता असलेल्या सर्कशीत केवळ २५-३० प्रेक्षक येत आहेत. हा प्रतिसाद म्हणजे सर्कसवाल्या कलावंतांना तोटाच नव्हे तर त्यांचा अपमान आहे. कलेची कदर न करणाऱ्या प्रशासनाने शहराबाहेर जागा देऊन एकप्रकारे सर्कशीला ‘गेट आऊट’च म्हटले. घोडे, उंट, गाड्या, माणसंच माणसं... एवढा लवाजमा पोसणारी सर्कस गावात आली की एखाद्या राजाची स्वारी आल्याचाच भास होत असे. आज या राजेशाही कलावंतांकडे प्रजा ढुंकूनही पाहायला राजी नाही.रोज तोटा सोसणाऱ्या सर्कसवाल्यांना खर्च मात्र अवाढव्य करावा लागतो. अमर सर्कसचे आनंद मॅनेजर म्हणाले, सर्कशीला जागा मिळविण्यासाठीच दोन लाखांचा खर्च आला. रोज पाण्याचे चार टँकर बोलवावे लागतात. रोज २०० लोकांचा स्वयंपाक होतो. हा खर्च २५ प्रेक्षकांच्या तिकीटमधून कसा भरून निघणार? सर्कशीकडे खरेच लोकांचा ओढा राहिलेला नाही. आम्ही तरी काय करणार? लोकांना जी गोष्ट हवी, ती आम्ही देऊ शकत नाही. सरकारने प्राण्यांवर बंदी आणली. आता आमच्याकडे वाघ-हत्ती राहिले नाही. ते लोकांचे मुख्य आकर्षण होते. तेच नाही, तर लोक कशाला येणार? पण सर्कस जगवायची आहे. टिकवायची आहे. म्हणूनच तोटा होत असला तरी गावोगावी फिरतो आहे. सर्कसवाले म्हणतात, सर्कस करायची तर मैदान हवे. ते आहे कुठे? शहराबाहेर. तिथेही ले-आऊट पाहोचले. आता हे एक मैदान (धामणगाव रोडवर) शिल्लक मिळाले. आधीच सर्कसकडे नव्या पिढीचे दुर्लक्ष. त्यात शहराबाहेर दूर एवढ्या दूर कोणता प्रेक्षक येणार? आनंद मॅनेजर आपली व्यथा मांडत होते. तोवर दुपारी १ वाजताच्या खेळाला सुरूवात झाली होती. प्रेक्षक मोजून पहिले तर बरोबर २४ होते. विषयच संपला.एखाद्या गावात सर्कस येणार म्हणजे, साधारण तीन दिवस त्यांचे पूर्ण साहित्यच आणायला लागतात. पूर्ण तंबू उभारणे, त्यात दोनशे लोकांना राहण्यासाठी म्हणून पाच-पंचेविस छोट्या राहुट्या उभ्या करणे या कामात दोन दिवस मोडतात. तंबू उभारणारे कामगार पूर्ण वेळ सर्कशीसोबतच असतात. एकीकडे कलावंतांचा सराव सुरू असताना कामगारांची वेगळीच सर्कस सुरू असते. कुठे खिळा निखळला तो लावा, कुठे तंबू फाटलाय तो शिवा, कोणता घोडा चार खात नाही त्याला चारा, कोणता उंट घाण दिसतोय त्याला धुवा, परिसरात कुठे कचरा झाला तो निस्तरा... एक ना अनेक. अविरत सर्कस. पण या सर्कशीची कदर नाही प्रेक्षकांना. हातचा रिमोट दाबला की हवे ते चॅनेल बघत बसणाऱ्या प्रेक्षकांना ही आपल्या गावात आलेली जिवंत कला कवडीमोल वाटतेय. देशातून अनेक सर्कशींच्या अस्तित्वाचा तंबू कधीचाच उठला. १० वर्षांपूर्वी देशात साधारण २५० च्या आसपास असलेल्या सर्कशींची संख्या आता ५०-६० पर्यंत उरलेली आहे. त्याही अखेरच्या घटका मोजत आहेत. सध्या यवतमाळात आलेली सर्कस तर थेट आसाम-नागालँडचे कलाकार घेऊन आलीय. पण वाघांची उत्सुकता असलेल्या यवतमाळकरांना या माणसांची कदर नाही. ज्या कलावंतांच्या कलेला ‘सर्कस’ असे नामाभिधान प्राप्त झाले आहे, त्याच कलावंतांना आज आपली कला टिकविण्याची सर्कस करावी लागतेय.कलाकारांसोबत आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आमच्या खेळाला प्रतिसाद मिळो की तोटा होवो, कलावंतांना ठरलेले पैसे द्यावेच लागतात. तुमच्या जिल्ह्याकडून आशा होती. पण हल्ली सर्कशीचे वाईट दिवस आलेत. सर्कशीला जागाच मिळेनाशी झाली. आता निदान गावाबाहेर तरी जागा मिळाली. यापुढच्या काळात गावाबाहेरही आम्हाला बसू देणार की नाही, प्रश्नच आहे.- आनंद मॅनेजर, अमर सर्कसयापूर्वी चंद्रपुरात होतो. यवतमाळात आल्याबरोबर पाण्याची चव आवडली. गेटमन म्हणून मी काम करतो. सातवीपर्यंत शिकल्यानंतर मोठ्या आशेने सर्कशीत आलो होतो. पण प्रेक्षक येत नाही त्याचे वाईट वाटते. फाटकावर एखाददुसरा माणूस आला की बरे वाटते. एक काळ होता, जेव्हा मला गर्दी कंट्रोल करावी लागायची. आता उदास मन नियंत्रणात ठेवावे लागत आहे.- रमेशकुमार बरो, गेटमन (मूळगाव मोंगलडई, आसाम)
सर्कशीमागची सर्कस
By admin | Updated: October 27, 2015 02:59 IST