कळंब : शासन सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविते. या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असते. परंतु सध्या तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा पडला असून ठराविक लोकांनाच योजनांचा लाभ मिळत आहे. खरे लाभार्थी यापासून वंचित राहत आहे. तर काही ठिकाणी मंजुरीच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. घरकुल योजना, शिधा पत्रिका, विधवा पेंशन योजना, अपंग वेतन, वृद्धांसाठी निराधार योजना, पंचायत समिती व कृषी विभागातून मिळणारे साहित्य, तहसील कार्यालय यासह अनेक विभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात एजंटांचे प्रस्थ वाढले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येतात. परंतु शासकीय कार्यालयात त्यांचा थांगपत्ता लागत नाही. अशा वेळी एजंट फायदा घेतात. विविध योजना मिळवून देण्याचे आमिष दिले जाते. शेतकऱ्यांना देखील सवलतीच्या दरात साहित्य मिळवून देण्याचे आमिष देऊन मोठी रक्कम लुबाडून घेतात, वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा
By admin | Updated: September 8, 2016 00:52 IST