पाणी पेटले : बोथबोडनच्या महिलांचा संताप, जिल्हा परिषदेवर धडक यवतमाळ : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. याचा अनुभव यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात मंगळवारी आला. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथील महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचल्या. त्या ठिकाणी महिलांनी घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यात गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतरही स्थानिक यंत्रणा उपाययोजना करीत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथेही गत दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या आहे. हातपंपाला पाण्याचा थेंब नाही. या गावाला अर्जुना तलावातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु जलस्रोत घटल्याने जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेल्या या तलावावरून बोथबोडनचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र झाली. गत दोन महिन्यांपासून पाण्याचा थेंबही मिळत नाही. दोन किलोमीटर अंतरावरून एका शेतातून पाणी आणावे लागते. उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याबाबत गावकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे तक्रार केली. गटविकास अधिकाऱ्यांनाही पाणीटंचाईची माहिती दिली. परंतु गावात टँकर सुरू झाला नाही. तोडगा काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या बोथबोडनच्या महिला मंगळवारी सकाळी ११.३० वाजता यवतमाळ जिल्हा परिषदेवर धडकल्या. त्यानंतर या महिला थेट सीईओंच्या कक्षात गेल्या. परंतु त्या ठिकाणी सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित नव्हते. त्यामुळे महिला अधिकच संतप्त झाल्या. आपल्या सोबत आणलेल्या मातीच्या घागरी कक्षात आदळून फोडल्या. तब्बल तासभर महिला तेथेच ठिय्या देऊन बसल्या होत्या. या प्रकाराने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर अभियंता सोनाली शेंडे यांनी गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची समस्या जाणून घेतल्या. परत जाताना महिलांनी आपल्या सोबत आणलेल्या कळशा रस्त्यावर फेकून पुन्हा संताप व्यक्त केला. यावेळी बोथबोडन येथील अनुप चव्हाण, सिकंदर शाह, रोहित राठोड, जितेंद्र राठोड, राजेश कुपरे, मीरा राठोड, गंगू पवार, शोभा राठोड, शेवीबाई राठोड, शकुंतला कुपरे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. सीईओंच्या कक्षात घागरी फोडण्याची ही घटना जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असावी. (शहर वार्ताहर )तर जिल्हा परिषदेत मुक्काम आंदोलनबोथबोडन येथील पाणीटंचाईचा प्रश्न येत्या आठ दिवसात निकाली निघाला नाही तर जिल्हा परिषदेत मुक्काम आंदोलन करण्याचा इशारा बोथबोडन येथील महिलांनी दिला आहे. दोन महिन्यांपासून आम्ही पाण्यासाठी भटकंती करीत आहो. आमचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नाही. गावात साधा टँकरही सुरू होत नाही. यामुळे आम्ही आता त्रस्त झालो असून प्रशासनाने दखल दिली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू, गावातील गुरेढोरे आणून जिल्हा परिषदेच्या आवारात सोडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. पाण्यासोबत चाऱ्याचा मुद्दाही महिलांनी उपस्थित केला होता. पाण्यासाठी हाहाकार यवतमाळ जिल्ह्यातील गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या ठरत आहे. स्थानिक अधिकारी पाणीटंचाईवर योग्य उपाययोजना करीत नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वणीपासून उमरखेडपर्यंत अनेक ठिकाणी पाण्याची समस्या असताना कुणीही लक्ष देत नाही, त्यामुळेच नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. याच उद्रेकातून बोथबोडनच्या महिलांनी घागरी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
सीईओंच्या कक्षात घागरी फोडल्या
By admin | Updated: April 27, 2016 02:33 IST