यवतमाळ : आचारसंहिता शिथील झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. मात्र या सभेला उपाध्यक्षासह चार सभापती गैरहजर होते. यावरुन रखडलेली कामे पूर्ण करण्याबाबत पदाधिकारी किती गंभीर आहे, हे दिसून येते. याच सभेत तिवसा येथील डायरियाच्या थैमानाचा मुद्दा गाजला. जिल्हा परिषदेतील कामे रेंगाळली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प होते. अनेक कामांची वर्कऑर्डर होऊनही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. प्रत्यक्षात पदाधिकार्यांनाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. गुरूवारी झालेल्या स्थायी समिती सभेला उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण व आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, महिला बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर आदी गैरहजर होते. अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी समजाकल्याण सभापती आणि विरोधकांच्या मदतीने सभेत कामकाजाचा आढावा घेतला. बैैठकीच्या सुरूवातीलाच तिवसा येथील डायरीयाच्या साथीचा मुद्दा चर्चेस आला. गावातील पाणी स्रोतात ब्लिचींग पावडर नसल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुंदन राठोड यांनी सांगितले. याप्रकरणी दोषी ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिले. त्यानंतर मागील सभेत उपाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रसुतीगृहाचा मुद्यावर दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. चार पंचायत समितीतील शाळा इमारतीच्या निर्लेखनाला मंजुरी देण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इजारा येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे अभियंत्याने सांगितले. बांधकाम विभागाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील १0 कामे मंजूर झाली आहे. तसेच तिसर्या टप्प्यातील सात कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. धडक सिंचन विहीर योजनेतील एक हजार १५0 विहिरी रद्द करण्यात आल्या. १४ हजार ८४५ विहिरी होत्या. त्यापैकी सात हजार १५२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. नरेगामध्ये तीन हजार २00 विहिरी रुपांतरित करण्यात आल्या आहे. तर जिल्हा परिषदेच्या चार यंत्रणेकडून एक हजार ३00 विहिरी धडक सिंचन योजनेतून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गव्हर्नमेंट हायस्कूलसाठी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. अद्यापही त्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याचे गटनेते देवानंद पवार यांनी सभेत सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी हे काम तातडीने सुरू करण्याचे ताकीद दिली. तसेच पवार यांनी माध्यमिक शाळेवर रिक्त असलेल्या १३५ जागांचा मुद्दा उपस्थित केला. पदोन्नतीमुळे रोस्टर निश्चित नसल्याने रखडल्याचे शिक्षणाधिकार्याकडून सांगण्यात आले. ऑगस्टपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल नरवाडे यांनी महागाव पंचायत समितीला शाखा अभियंता नसल्याचे सांगितले. तसेच अंबोडा-चिखलगाव रस्त्याच्या कामाची पुनर्निविदा करण्याची मागणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
स्थायी समिती सभेला सभापतींची दांडी
By admin | Updated: May 15, 2014 23:57 IST