कळंब : स्वच्छ भारतासाठी केंद्र सरकारने मिशन हाती घेतले आहे. विशेष म्हणजे अभियान काळात शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबाचा शासकीय यंत्रणेकडून सत्कार केला जाणार आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. कळंब (यवतमाळ) तालुक्यात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यास प्रारंभ झाला आहे.केंद्र शासनाचा हा कार्यक्रम देशभर राबविला जाणार आहे. यात ग्रामीण जनतेचा सहभाग मिळविण्यासाठी व्यापक जनजागृतीचे निर्देश आहे. यासाठी तालुका ते राज्यस्तरावर एक हजार एक विविध विषयांचे सल्लागार कार्यरत करण्यात आले आहे. यातील प्रत्येकाने दैनंदिन किमान पाच गृहभेटी देऊन रोज सहा हजार ९०० कुटुंबांना संदेश दिला जाणार आहे. सन २०१४-१५ च्या वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब असतील अशा ग्रामपंचायतीची प्राधान्यक्रमाने निवड अभियानासाठी करण्याची सूचना आहे.अभियानातील प्रमुख संदेशामध्ये शौचालय बांधकाम व वापर, शाळांमध्ये पर्याप्त प्रमाणात मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती, हात धुण्याचे महत्त्व आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा असे आहे. ही माहीती गावपातळीवरपर्यंत पोहचविण्यासाठी चिंतर शिबिर, गृहभेटी, निबंध व चित्रकला स्पर्धा, मेळावे घेण्याच्या सुचना आहे. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याची सूचना आहे. तसेच महिलांचा ठळक अक्षरात उल्लेख करावा लागणार आहे. अभियान कालावधीत शौचालय बांधकाम सुरू करणाऱ्या कुटुंबाचा सत्कार गावपातळीवर करण्याच्या सूचना आहे. येणाऱ्या काळात अभियानाची फलश्रुती किती, हे दिसून येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्वच्छ भारतासाठी केंद्र सरकारचे अभिनव मिशन
By admin | Updated: October 1, 2014 23:29 IST