वणी : वन विभागाने राबविलेल्या शतकोटी वृक्ष लागवडीचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रूपये पाण्यात जात आहे. वणी वन परिक्षेत्रांतर्गत सोनापूर-वनोजादेवी येथील वन जमिनीवर सन २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रूपये खर्च करून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली़ तथापि लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याकडे वन विभागाचे व संबंधित क्षेत्र साहाय्यकाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करून लावलेल्या वृक्ष लागवडीचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे़वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हा मुख्य हेतू होता़ मात्र भ्रष्ट वृत्तीमुळे जंगले साफ होऊन वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शासनाने मोठा गाजावाजा करून शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी लाखो रूपयांचा निधीही वनविभागाला उपलब्ध करून देण्यात आला. मात्र वन विभागातर्फे केवळ कागदोपत्री शतकोटी वृक्ष लागवड केल्याचे व जिवंत वृक्षांचे अधिक प्रमाण दाखवून शासनाच्या निधीची वाट लावत असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवडी ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र वन विभाग आपले खिसे कसे भरता येईल, त्यातच मश्गुल दिसून येत आहे. त्यामुळे बहुतोश वनांतील वृक्ष लागवड नावापुरतीच ठरत आहे. लावलेली झाडे जिवंत आहेत काय, किती झाडे जिवंत आहेत, याची चौकशी करण्याची गरज आहे. सोनापूर-वनोजादेवी येथील लागवडीचे मूल्यांकन करून उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची गरज आहे. याबाबत वृक्षप्रेमी निरंजन घायवन यांनीही चौकशीची मागणी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ
By admin | Updated: February 11, 2015 00:10 IST