आर्णी : बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या बाजूला आर्णी नगरपरिषदेकडून बांधकाम सुरू आहे. मात्र या कामास विनाकारण विलंब होत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला बांधकाम साहित्य आणून पडले आहे आणि नालीही खोदून ठेवली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी कमालीचा त्रास होत आहे. या बाबत व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या कालावधीत नगरपरिषदेने त्वरित बांधकामाला सुरुवात न केल्यास रोडवर टाकलेल्या गिट्टी, रेतीनेच खोदलेली नाली पुन्हा बुजविण्यात येईल, असा इशारा आज व्यापाऱ्यांनी दिला आहे. तसे फलक तयार करून गिट्टीच्या ढीगावर लावण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे हा फलक सोशल मीडियावरही झळकत आहे. यावर नालीचे काम झालेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात या परिसरातील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता गोलू राठी हे व्यापारी म्हणाले, मागील एक महिन्यापासून नाली खोदून ठेवली आहे. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे नालीत पाणी जमा झाले आहे. नाली रुंद असल्याने व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दुकानात ये-जा करण्यासाठी चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास होत असून दुर्गंधी येत आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.या सर्व बाबींची वारंवार नगरपरिषदेला माहिती देवूनसुद्धा ते कोणताही प्रतिसाद देत नाही. आर्णीचे प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे यांना या बाबत व्यापाऱ्यांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेने त्वरित पाऊले न उचलल्यास नाली बुजविणार असल्याचा इशारा आर्णी परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांचा पालिकेला इशारा
By admin | Updated: March 12, 2015 02:18 IST