नेर तालुक्यात प्रशासन ढिम्म : निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांच्या दैनेची कुणी घेणार का दखल ?नेर : यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला. त्यामुळे सध्या अंकुरलेल्या पिकांना गुंडाने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.भारतीय कृषी व्यवस्थेची रोगट अवस्था पूर्वापार आहे. सततच्या राजकीय बदलांच्या वरवंट्याखाली रगडा होतोय तो शेतकऱ्यांच्याच. निसर्गाच्या अनियमितपणाच्या जात्यामध्येही तोच भरडला जातोय. ऋतूबदलाचे विपरित परिणाम शेतीवर झाले. उन्हाळ्यात पाऊस अन् पावसाळ्यात उन्हाळा अशी स्थिती झाली. फक्त मृगात काही दिवस पाऊस पडला. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पेरणीसाठी त्याला कधी बँकेचे तर कधी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्र तर कोरडेच गेले. पाण्यासाठी आकाशाकडे पाहात त्याच्या डोळ्यात पाणी तर आलेच; पण सोबतच तोंडचे पाणीही पळाले. दुबार पेरणीची त्याला चिंता वाटू लागली. बँकांनी तर शेतकऱ्यांचे पाशच आवळले. कारण मागील वर्षाचे कर्ज फेडले नाही व कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. बँकांनी कर्ज दिले नाही. शेतऱ्यांवर विदारक परिस्थिती ओढवली. दुबार पेरणीसाठी त्याला पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. शेतकरी कुटुंबातील स्त्रीची वेदना ही काळजाच्या चिंध्या करणारी आहे. अस्मानी सुलतानी गर्तेत शेतकरी वर्ग सैरभैर झाला आहे. ग्लोबल वार्मिंगबरोबरच आर्थिक तंगीत तो होरपळू लागला.दुबार पेरणी झाल्यावर नवीन अंकुर जमिनीवर तरारू लागले. पण दुपारचा सूर्य आग ओकू लागल्यामुळे नाजूक कोंब माना खाली टाकू लागले. उन्हाळ्यात तापलं नाही एवढे उन जुलैमध्ये आहे. उन्हामुळे पिके करपू लागली. हे पीक कसेतरी जगवावे म्हणून शेतकरी गुंडाने नवीन अंकुरांना पाणी देऊ लागला आहे. मात्र, ही तजवीजही किती दिवस जमणार आहे? पेरणीच्या वेळात ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणून अधिक महिना आला. पुण्य पदरी पडावे म्हणून जावयांसाठी कपडे, भांडी व फराळाची मेजवाणीची तजवीज कशी तरी करावी लागली. अधिक महिना भाग्याचा ठरण्याऐवजी तो दुर्भाग्याचा ठरला. कारण संपूर्ण अधिक महिना पावसाविना कोरडाच गेला.कास्तकार अधिकच हतबल झाला. कपाळाला हात लावून मोठ्या आशेने शेतकरी आकाशाकडे पाहात आहेत. ज्या जमिनीमुळे त्याला इज्जत मिळत आहे, तीच आता त्याच्या पायाखालून निसटत आहे. कारण रोगट कृषी व्यवस्थेचा जुनाट रोग आता एवढा विकोपाला गेला आहे की, तो तात्पुरत्या उपचाराने बरा होणारा नाही. (तालुका प्रतिनिधी)
गुंडाने द्यावे लागतेय पिकाला पाणी
By admin | Updated: July 19, 2015 02:38 IST