बाभूळगाव : येथे दूरसंचार विभागाने टोलेजंग कार्यालय उभारले असले तरी आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत असून गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.यवतमाळ येथून जमिनीखालून येणारी दूरसंचार विभागाची केबल सरळ बाभूळगावला न पोहोचता यवतमाळ व्हाया कळंब व नंतर बाभूळगाव अशी टाकण्यात आली आहे. त्यामुळे कळंब तालुक्यात कुठेही केबलमध्ये बिघाड आल्यास बाभूळगाव तालुका आपोआप ठप्प पडतो. दूरसंचार विभागाने बाभूळगाव येथे भले मोठे कार्यालय उभारले आहे. मात्र नोकर भरती कपात केल्यामुळे केवळ दोन फोन मॅकेनिक या ठिकाणी सेवा देत आहेत. पैकी दूरसंचार विभागाच्या परिसरात शासकीय निवासस्थानात प्रभाकर अळसपुरे हेच फक्त कायम हजर असतात. येथील शाखा अभियंता घोंगडे यांचेकडे राळेगाव, कळंब, बाभूळगाव या तीन तालुक्यांचा भार असल्याने ते यवतमाळवरूनच तिन्ही तालुक्याचे कामकाज पाहतात. याच विभागाचे एसडीओ शेटे यांचे कायम या तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येते. कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ले-आऊटची उभारणी केली जात आहे. जेसीबीने नालीचे काम करीत असताना अनेकदा दूरसंचाची केबल तुटून कळंब तालुक्यासह बाभूळगावचीही लॅन्डलाईन सेवा बंद पडते. बाभूळगाव तालुक्यात सरूळ, दाभा, कोटंबा व सावर हे मोठे केंद्र आहेत. बाभूळगाव वरून या केंद्रांना दूरध्वनीसेवा पुरविण्यात आली आहे. मात्र कळंबमध्ये समस्या निर्माण झाली की बाभूळगाव बंद पडते. यवतमाळ येथून निघालेली केबल सरळ बाभूळगावला न टाकता कळंब मार्गे आणण्यात आल्याने ही समस्या वेळोवेळी निर्माण होत आहे. ८ मार्चच्या रात्रीपासून बाभूळगाव तालुक्याची बंद असलेली दूरसंचार विभागाची सेवा बातमी लिहिपर्यंत सुरू झालेली नाही. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वरिष्ठांकडून अधिक माहिती घेतली असता कळंब येथील दूरसंचार कार्यालयातील बॅटऱ्या निकामी झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे बाभूळगाव तालुक्यातील दूरसंचार सेवा विस्कळीत झाली. वरिष्ठांनी जातीने लक्ष घालून सेवा पूर्ववत करावी, अशी त्रस्त टेलिफोन ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून बाभूळगाव येथील बीएसएनएल सेवा ठप्प
By admin | Updated: March 12, 2015 02:24 IST