यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील पेरका येथील एका पुलाखाली तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा अकस्मात मृत्यू नव्हे तर खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन मारेकऱ्यांना गजाआड करण्यात आले असून त्यांनी जादुटोण्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. गणेश लक्ष्मण मेश्राम (३०) रा. सावंगी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो ६ फेब्रुवारीला रहस्यमयरीत्या घरुन बेपत्ता झाला होता. त्यानंतर ९ फेब्रुवारीला कोपरी शिवारात त्याचा एका पुलाखाली अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेहच आढळून आला होता. घटनेनंतर त्याचा भाऊ लक्ष्मण मेश्राम याने या प्रकरणी राळेगाव पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये भावाचा खूनच झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्याकडे सोपविला होता. त्यांनी गोपनीय माहिती आणि मोबाईल लोकेशनवरुन नितीन धुर्वे रा. सावंगी आणि पवन एंबडवार रा. अंतरगाव यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनीही जादुटोण्याच्या संशयावरून दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. तसेच डिझेल ओतून मृतदेह पेटवून दिला. कारवाईत फौजदार सुगद पुंडगे, संजय दुबे, सचिन हुमणे, साजीद खान, आशिष चौबे, योगेश डगवार, चालक वानोळे आदींनी सहभाग घेतला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
निधीपूर्वी कोट्यवधींचे प्रस्ताव
By admin | Updated: February 11, 2015 00:04 IST