थकीत वेतन : भर पावसात एसडीओ कार्यालयावर मोर्चाउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे १० महिन्यांपासून वेतन न झाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या कामगारांनी बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मांगो’ आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. भर पावसात निघालेल्या या मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले होते. वसंतच्या कामगारांचे १० महिन्यांपासून पगार झाले नाही. कारखान्याकडे १२ कोटी पगार थकित आहे. त्यामुळे या कामगारांनी गत १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन केले परंतु कारखाना प्रशासन बोलणीस तयार नाही. शेवटी बुधवार १२ आॅगस्ट रोजी वसंतचे शेकडो कामगार उमरखेड येथे धडकले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चातील कामगारांनी कारखाना विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या मोर्चाचे नेतृत्व कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे आणि व्ही.एम. पतंगराव यांनी केले. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी पंडीत माने, नारायण आमले, मोतीराम शिंदे, चिमणराव नरवाडे, आर.डी. पांढरे, विनोद शिंदे आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चा निघाला तेव्हा जोरदार पाऊस कोसळत होता, मात्र पावसाची तमा न बाळगता मोर्चेकरी एसडीओ कार्यालयात पोहोचले. या मोर्चात अपंग कर्मचारीही सहभागी झाले होते. अपंग कर्मचारी रस्त्यावरून चालताना पाहून अनेकांच्या डोळ््यात अश्रु तरळत होते. संचालक मंडळाने तात्काळ थकीत वेतन दिले नाही तर न्यायालयीन लढाईसोबतच आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पी.के. मुडे यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)
‘वसंत’च्या कामगारांचे ‘भीक मांगो’ आंदोलन
By admin | Updated: August 13, 2015 03:14 IST