ग्रामीण रूग्णालय : मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकांना त्रासवणी : येथील ग्रामीण रूग्णालयातील शव शीतगृह गेल्या वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वणी तालुका हा औद्योगिक दृष्टीने मोठा आहे. तालुक्यात अनेक परप्रांतीय कामगार आहेत. तालुक्यात अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. एक दिवसाआड कुठे ना कुठे, अपघात घडत असतात. यात एखाद्याला आपले प्राणही गमवावे लागतात. मृतदेहांना ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यासाठी शव शीतगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ते सध्या बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही मृतदेहांना नातेवाईक येईपर्यंत दोन ते तीन दिवस रूग्णालयात ठेवावे लागतात. मात्र शीतगृह बंद अवस्थेत असल्याने मृतदेह जागीच सडून जाण्याची शक्यता असते. ग्रामीण रूग्णालयात येणारे अनेक रूग्ण व त्यांचे नातेवाईक अशा मृतदेहांना पाहून घाबरतात. त्याचबरोबर पोलिसांनाही नातेवाईकाला मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी अडचण निर्माण होते. काही नातेवाईकांना तर मोक्षधामातून स्वत: पैसे देऊन शवपेटी आणावी लागते. गरीब नातेवाईकांना ती आणणे शक्य नसल्याने मृतदेह दवाखान्यात ठेवावा लागतो. त्यामुळे दोन दिवसात मृतदेहाची दुर्गंधीही सुटते. ग्रामीण रूग्णालयातील शव शिवगृहामध्ये गेल्यावर्षी बिघाड आला होता. त्यावेळी अकोला येथील कर्मचाऱ्यांनी तो दुरूस्तही केला होता. मात्र लगेच १५ दिवसांनी त्यात करंट आल्याने शीतगृह पुन्हा बंद करण्यात आले. तेव्हापासून हे शीतगृह दुरूस्तीअभावी बंदच पडून आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रूग्णालयातील शव शीतगृह त्वरित दुरूस्त करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
वणीतील शवशीतगृह वर्षभरापासून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 02:45 IST