विविध समस्या : नगर सुधारणा अभियानांतर्गत शिवसेनेचा पुढाकारघाटंजी : शहरात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहे. याकडे नगरपरिषद व इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी घाटंजीतील सर्व समस्यांचे प्रतीक म्हणून रविवारी मारबत काढली. शहरात मुख्य रस्ते अतिशय खराब झाले आहे. रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. नाल्या चोकअप झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापनाची वाट लागली आहे, पाणीपुरवठा अनियमित व दूषीत होत आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मागील महिन्यात यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषणही केले होते. परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे बडग्याच्या दिवशी शहरातून मारबत काढण्यात आली. ती नगरपरिषदेसमोरून पोलीस ठाणे, शिवाजी चौक, आंबेडकर चौक मार्गे घाटी येथील राजीव गांधी चौकात नेण्यात आली. तिथे निषेध सभा घेण्यात आली. मोर्चाचे संयोजक शैलेश ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सय्यद फिरोज, सलिम छुट्टानी, विनोद महाजन, शैलेश वर्मा, विशाल अटारा, भावेश गंडेचा, अमीत प्रधान, अतिश मंथनवार, भावेश मोमीडवार आदींसह शिवसैनिक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी नगरपरिषदेचा निषेध करून आपला रोष व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजी येथे बडगा आंदोलन
By admin | Updated: September 14, 2015 02:34 IST