रुपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ सिंचन वाढण्यात मुख्य अडसर ठरलेला कृषिपंप वीज जोडणीचा प्रश्न आता निकाली निघाला असून वर्षभरात तब्बल १० हजार कृषिपंपांना वीज जोडणी केल्याचा दावा वीज वितरण कंपनीने केला आहे. यामुळे सिंचनाच्या सुविधेत वाढ होणार असली तरी पुरेशी वीज मिळेल याची कोणतीही खात्री शेतकऱ्यांना नाही.यवतमाळ जिल्ह्यात गत काही वर्षांपासून कृषी पंपाच्या वीज जोडणीचा अनुशेष कायम होता. या प्रश्नावर शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली. मात्र उपयोग होत नव्हता. साधारणत: तीन वर्षाचा बॅगलॉग कायम होता. शेवटी यवतमाळच्या सभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज वितरण कंपनीला अल्टीमेटम देत ३१ मार्चपर्यंत वीज जोडण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वीज वितरण कंपनी खडबळून जागी झाली. उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी कंत्राटदार कंपनी आड येत होती. अशा कंत्राटदारांना वीज वितरणने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले. नवीन कंत्राटदारांकडे काम सोपविण्यात आले. त्यामुळे वीज वितरणच्या कामाची गती वाढली. परिणामी वर्षभरात १० हजार ५२ वीज जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. नवीन ९ हजार ९१३ अर्ज प्राप्त झाले आहे. आता त्यांचा प्रश्न वीज वितरण कंपनीपुढे निर्माण झाला आहे. धडक सिंचन विहिरींमुळे कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जुन्या अर्जांची पेन्डन्सी संपत नाही तोच नवीन अर्ज वीज वितरण कंपनीत येऊन धडकले आहे. कृषीपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा गत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना होती. शेतात मुबलक पाणी असले तरी विजेअभावी ओलित करणे कठीण झाले होते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्नातून अशक्यप्राय उद्दिष्ट शक्य केले. या उद्दिष्टपूर्तीमुळे शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य होणार आहे. - विजय भटकरअधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी
कृषिपंप वीज जोडणीचा अनुशेष अखेर संपला
By admin | Updated: April 4, 2016 05:28 IST