यवतमाळ : जिल्ह्यात ४६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर २८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी ८० टक्के झाले असून ३ हजार ५२८ जागांसाठी तब्बल ८ हजार ९०३ उमेदवार भाग्य आजमावित आहे. काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांमध्येही उत्साह दिसून आला. ६ लाख ८६ हजार ५२९ मतदारांपैकी सरासरी ८० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४ लाख ५ हजार ९१५ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये २ लाख ७६६ महिला तर दोन लाख पाच हजार १४९ पुरुषांचा समावेश आहे. यवतमाळ तालुक्यातील शहरी भागाच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी नेहमीप्रमाणेच कमी आहे. येथे मतदार यादीतील घोळामुळे दुपारी ३.३० पर्यंत केवळ ४४ टक्के मतदान झाले होते. या उलट झरीजामणी, आर्णी, कळंब, मारेगाव या तालुक्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे. सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांना आकडेमोड करण्यासाठी केवळ एक दिवसाचा अवधी मिळाला आहे. गावातील चावड्यांवर बसून आता आपल्या परीने एक्झीट पोल काढण्याचे काम सुरू आहे. निवडणूक कर्तव्य सोडून प्रचार करणाऱ्या शिक्षकावर कारवाई महागाव तालुक्यातील सवना येथील शिक्षक रामराव त्र्यंबक टेकाळे यांची फुलसावंगी येथे निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली होती. फुलसावंगी येथे पोलिंग पार्टी सोबत गेलेले टेकाळे हे रात्री मुक्कामी न थांबता परत सवना येथे आले. त्यांनी गावात जाहीररीत्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. ग्रामस्थांनी या शिक्षकाला प्रचार करताना रंगेहात पकडून तहसीलदारांच्या स्वाधीन केले. तहसीलदारांनी शिक्षकावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तर पुसद तालुक्यातील वनवार्ला येथे मतदान केंद्रावर हाणामारी झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबली होती. (कार्यालय प्रतिनिधी)
सरासरी ८० टक्के मतदान
By admin | Updated: July 26, 2015 02:18 IST