यवतमाळ : यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची निर्माण झालेली टंचाई. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल तसे आणि मिळेल तेथून सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र आता सोयाबीनवर मोझॅक या रोगाचे आक्रमण झाले. विषाणूजन्य या रोगाने सोयाबीनचे मोठे क्षेत्र कवेत घेतले. बियाण्यातूनच मोझॅक पसरल्याचा संशय व्यक्त होत आहे. बियाणे निर्मिती करताना कंपन्यांनी काळजी घेतली नसल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. गत वर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. बियाणे निर्मितीसाठी असलेल्या प्लॉटचेही नुकसान झाले. परिणामी यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई निर्माण झाली. जिल्ह्यात अपेक्षित बियाण्यांच्या ३० टक्केच बियाणे उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेरील जिल्ह्यातून बियाणे खरेदी केले. तर काही शेतकऱ्यांनी कृषीविभागाच्या सल्ल्यानुसार घरीच बियाणे तयार केले. अनेक कंपन्यांनी याच परिस्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारले. सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरण्या लांबल्या. एकदाची पेरणी आटोपली मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नाही. पोळ््यापासून पावसाला सुरूवात झाली. पिके जोमाने वाढू लागली, आणि अशातच सोयाबीन, कपाशीवर किडींनी आक्रमण केले. जिल्ह्यात दोन लाख ३४ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. सध्या सोयाबीनवर मोझॅक या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेंड्याकडून पाने पिवळी पडून संपूर्ण झाडच पिवळे पडत आहे. रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटते, पाने जाडसर होतात, अशा झाडांना शेंगाही कमी येतात. निरोगी झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव मावा व पांढऱ्या माशीव्दारे होतो. जिल्ह्यातील मोठे क्षेत्र सध्या मोझॅक रोगाच्या कवेत आले आहे. मोझॅक रोगाचे जिवाणू बियाण्यामधूनच पसरल्याची भिती व्यक्त होत आहे. निर्मिती करताना कंपन्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार केले. त्यातूनही या रागाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)
सोयाबीन पिकावर ‘मोझॅक’ रोगाचे आक्रमण
By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST