पहूर पुनर्वसन : भीम-बिरसा नगरातील कुटुंब उघड्यावरयवतमाळ : स्थानिक धामणगाव मार्गावर असलेल्या पहूर पुनर्वसनाच्या भीम-बिरसानगर भागातील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे तेथील ८० कुटुंब उघड्यावर आले आहे. या नागरिकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर धडक देऊन आपले प्रश्न मांडले. सदर भागात मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारक कुटुंब वास्तव्याला होते. कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरावर बुलडोजर चालविण्यात आला. हा प्रकार अन्याय करणारा असल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही कुठे वास्तव्य करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यावर तोडगा न काढल्यास जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विकास परिषदेचे सचिव बाबाराव मडावी, बिरसा क्रांतीदलाचे अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले. भारिप-बहुजन महासंघाचे गुणवंत मानकर, अखिल भारतीय समाज प्रबोधन कला संघाचे अध्यक्ष प्रताप लोणारे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव कांबळे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दिग्रस विधानसभा अध्यक्ष श्रावण किनाके, मदन वरघट आदी यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
अतिक्रमणग्रस्तांची कचेरीवर धडक
By admin | Updated: June 10, 2016 02:33 IST