काम बंदचा इशारा : सामाजिक न्यायमंत्र्यांना साकडेयवतमाळ : राज्यातील १४८ विजाभज उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सात वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर मंगळवारी या शिक्षकांनी मुंबईत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन सादर करून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.महाराष्ट्र राज्य विजाभज कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर संघर्ष समितीने गेल्यावर्षीही वेतनाच्या मागणीसाठी यवतमाळात दीर्घकाळ उपोषण केले होते. त्यावेळी अनेक बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन वेतन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटले तरी त्यांच्या मागणीला दाद मिळालेली नाही. अखेर संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. आर. यू. राठोड यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी मुंबईत धडक दिली. सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन दिले. मागणी मान्य न झाल्यास येत्या २३ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे देण्याचा व कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. २६ जून २००८ च्या शासननिर्णयानुसार सदर कर्मचाऱ्यांना वेतन देणे बंधनकारक असूनही त्यांना विनावेतन राबावे लागत आहे. सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आपले वेतन अडलेले आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मागणी मान्य न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी वेतनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी विविध प्रकारची आंदोलने केली. संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडेही साकडे घालण्यात आले. मात्र त्यांचा हा प्रश्न कुणीही निकाली काढला नाही. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा विद्यमान सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदन देताना संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. आर. यू. राठोड, उपाध्यक्ष सी. के. शिंदे, सचिव प्रा. आर. एस. देवळे आदी उपस्थित होते.
आश्रमशाळा कर्मचारी वेतनाविना
By admin | Updated: July 22, 2015 00:19 IST