हिवरी : गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहे. उघाडीच्या काळात मरगळलेल्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. अशा स्थितीत युरियासारखे खताचा वापर करून पिकाची खुंटलेली वाढ जोमाने करण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. अचानक एकाचवेळी युरियाची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. वाजवीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्ह्यातील कृषी विभाग मात्र डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. दुबार आणि तिबार पेरणीने जेरीस आलेल्या शेतकरी पावसाच्या दडीमुळे हतबल झाला होता. खरिपाचा हंगाम हातून जाणार अशी चिन्हे दिसत होती. सोयाबीनचे पीक शेतात असले तरी पावसाअभावी ते फुलणारच नाही याची खात्री झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने आणि ऐन वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे पीक हाती येईल अशी आशा निर्माण झाली आहे. सोयाबीन फुलावर येण्याचा हा कालावधी असल्याने पिकाची खुंटलेली वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांकडून युरियाचा वापर केला जात आहे. कपाशी आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना युरिया देण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत आला आहे. ही संधी साधून कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना लुबाडल्या जात आहे. मागणीपेक्षा युरियाचा साठा कमी असल्याने भीषण टंचाई भासविण्याचा प्रयत्न होत आहे. कसेबसे पावसाने तग धरलेल्या पिकाला युरिया देऊन उभारी देण्याचा प्रयत्न होत असताना कृषी केंद्र चालक मात्र शेतकऱ्याला वेठीस धरत आहे. युनियाच्या एका बॅगसाठी ४०० रुपये मोजावे लागत आहे. बरेचदा तर टंचाई भासवण्यासाठी कारण नसताना शेतकऱ्यांना या दुकानातून त्या दुकानात येरझारा मारण्यास भाग पाडले जात आहे. या सर्व प्रकाराकडे राज्य कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग दुर्लक्ष करत आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
युरियाचा कृत्रिम तुटवडा
By admin | Updated: August 27, 2014 23:52 IST