जयसिंग गोहोकार : ‘बार्टी’तर्फे आदर्शला पुस्तकांची भेटवणी : सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांनी सतत ग्रांथाच्या सहवासात राहावे, असे आवाहन जयसिंग गोहोकार यांनी केले. ते बुधवारी येथील आदर्श विद्यालयात ‘बार्टी’तर्फे ग्रंथ भेट कार्यक्रमात बोलत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन केवळ ज्ञानार्जनाला वाहून घेतले होते. त्यांचे ग्रंथ वाचन, लेखन व विचार आजही नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांच्या देश व समाजाच्या विकासाला गती देणारे व दिशा देणारे ग्रंथ प्रेम व लेखनाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंग गोहोकार यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, माझ्याकडच्या मौल्यवान वस्तू चोरांनी चोरून नेल्यानंतर मला विशेष काही वाटणार नाही. मात्र माझी पुस्तके, ग्रंथ कोणी चोरून नेत असतील, तर मी प्रमाणपणाने लढून चोरांना पळवून लावून माझ्या ग्रंथांचे रक्षण करीन, असे बाबासाहेब एकदा म्हणाले होते. यावरून त्यांचे निखळ ग्रंथ व पुस्तक प्रेम दिसून येते. मात्र अलिकडे व्हॉट्सअॅप, इंटरनेट, फेसबुक व दूरचित्रवाहिण्यामुळे वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाचन संसकृती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञानार्जनाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे आदर्श विद्यालयाला ग्रंथ भेट देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २०१५-१६ हे वर्ष ‘समता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेऊन समता वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. समता निर्माण करण्यासाठी संत व समाजसुधारकांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी झरी तालुक्याचे समता दूत सूरज चौधरी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव म.वि. वल्लपकर, नगराध्यक्ष करूणा कांबळे, प्रभारी मुख्याध्यापक अल्ताफ कुरेशी, जयंत साठे उपस्थित होते. संचालन वैजनाथ खडसे, प्रास्ताविक किशोर शंकावार, तर आभार किरण जाधव यांनी मानले. पिदूरकर, खुजे, बारमासे, गिरी, कांबळे, वल्लपकर, वऱ्हाटे, वरारकर आदींनी सहकार्य केले. (कार्यालय प्रतिनिधी)
सतत ग्रंथांच्या सहवासात राहण्याचे आवाहन
By admin | Updated: February 21, 2016 02:08 IST