यवतमाळ : नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्यांची अवस्था अतिशय विदारक आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या लोकमत चमूने या ठिकाणी सोमवारी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता एक पुसद वगळता इतर ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. कुणीही या टाकीवर चढा, काहीही करा, अशी स्थिती ठिकठिकाणी दिसून आली. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली गावात पाण्याच्या टाकीत विष टाकण्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. महिनाभरापूर्वी दारव्हा तालुक्यातील घनापूर येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीत विष कालवण्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे जलसाठे आणि जलकुंभ किती सुरक्षित आहे याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत’ने सोमवारी स्टिंग आॅपरेशन केले, त्यात हे वास्तव उघडकीस आले. तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या मुख्यालयी यवतमाळ शहरातील तेथी जिवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात असलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्यांना कोणतीही सुरक्षा नाही. येथील गोदणी मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयातील आवारातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या टाक्या आहेत. परंतु या टाक्यांना कोणतीही सुरक्षा नाही. कुणीही या कुणीही चढा, काहिही करा, अशी स्थिती या ठिकाणी सोमवारी दुपारी १.३० ते दोनच्या दरम्यान ‘लोकमत’चमूने प्रत्यक्ष अनुभवली. प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांच्या कक्षालगत असलेल्या या दोन पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा किती चोख आहे, हे पाहण्यासाठी लोकमत चमुतील दोन सदस्य या ठिकाणी पोहचले. कुणीही चौकीदार नाही, गेट नाही, कुलूप नाही असे वास्तव येथे पाहायला मिळाले. त्यानंतर दहा मिनिटे खाली फोटो सेशन केल्यानंतर या टाक्यांवर असलेल्या पायऱ्याने वर चढले. परंतु कुणीही टोकले नाही. खालून वर, वरून खाली दोन-तीन राऊंड मारल्यानंतर आणि फोटो काढल्यानंतर जवळपास अर्ध्यातासानंतर एक व्यक्ती तिथे आली त्यांनी त्यांचा परिचय आॅपरेटर म्हणून दिला. यावेळी त्यांना या ठिकाणी टाकीवर चढण्यासाठी कुणी टोकत नाही का, अशी विचारणा केली असता, सावरा-सावर करीत त्यांनी आम्ही आहो ना, असे म्हटले. अहो पण आम्ही टाकीवर जाऊन आलो, असे सांगितल्यावर ते खजिल झाले आणि वरिष्ठांना कल्पना देतो, असे म्हणून निघून गेले. टाकीवर चढताना पायऱ्यांवर सुरूवातीला नाही म्हणायला एक छोटे लोखंडी गेट आहे. परंतु तेसुद्धा भंगार अवस्थेत सताड उघडे होते. कार्यालयीन वेळेत ही स्थिती होती तर सकाळी, रात्री किंवा सुटीच्या दिवशी या टाक्यांच्या सुरक्षेविषयी काय स्थिती असेल याची कल्पना न केलेली बरे. शहरातील लाखो लोकांना पाणी ज्या टाक्यांमधून पुरविले जाते, त्या टाक्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी नाहीत, ही बाब ध्यानात आल्यावर कुणाच्याही पायाखालून वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. यवतमाळ शहराप्रमाणेच वणी येथील पाणीपुरवठ्याची स्थिती अतिशय खालावलेली आहे. जीवन प्राधिकरणाकडून २० ते २५ वर्षांपूर्वीच पाणीपुरवठा यंत्रणा नगर परिषदेकडे हस्तांतरीत झाली आहे. टिळक चौकात शासकीय मैदानाजवळ असलेल्या या पाण्याच्या टाकीवर कुणीही या कधीही या आणि काहीही करा, अशी परिस्थिती अनुभवास मिळाली. कोणतीही सुरक्षा नाही, कुणी विचारायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात गाळ साचलेल्या आणि अनेक वर्षांपासून स्वच्छ न केलेल्या या टाकीवर प्रत्यक्ष भेट दिलेल्या लोकमत चमुने पाहले व छायाचित्रही काढले. जीवन प्राधिकरणाकडून आणि वणी येथील नगर परिषदेकडून नागरिकांच्या जिवित्वाशी खेळ सुरू असल्याचेच यातून स्पष्ट होते. (लोकमत चमू) पुसद ठरले अपवाद४एकीकडे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ व वणी सारख्या शहरांमध्ये शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांची सुरक्षा वाऱ्यावर असताना पुसद येथील जलकुंभांची सुरक्षा चोख असल्याचे दिसून आले. या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता लोकमत चमू पोहचली असता नगर परिषदेच्या जलकुंभाची कडेकोट सुरक्षा दिसून आली. या ठिकाणी संरक्षक भिंत असून चौकीदार गजानन इंगोले यांनी अडवून काय काम असल्याचे विचारले. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली. मुख्य प्रवेशद्वारातून आत नेले.
कुणीही या, जलकुंभावर चढा
By admin | Updated: June 21, 2016 02:07 IST