बोरीच्या बँकेत अचानक गर्दी : बचत गटांच्या पासबुकवर नजरा रूपेश उत्तरवार यवतमाळ ज्या खात्यांमध्ये आजपर्यंत कधीही व्यवहारच झाले नाही, अशा जनधन खात्यांमध्ये सरकारने पैसे जमा केल्याच्या अफवेचे पेव फुटले आहे. त्यामुळे नव्याने खाते काढण्यासाठी स्टेट बँकेच्या शाखांमध्ये एकच गर्दी उसळली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनधनअंतर्गत नागरिकांनी खाते काढले. ही खाती शून्य बॅलंसवर काढण्यात आली. परिणामी जवळपास सर्वच खात्यात ठणठणाट आहे. मात्र चलनबंदीच्या आदेशानंतर काही खात्यांमध्ये केंद्र सरकारने मोठी रकम जमा केल्याची आवई आता उठविण्यात आली. प्रत्यक्षात ही रक्कम कुणीतरी त्रयस्थाने जमा केली. तो काळा पैसा असल्याच्या संशयाने जनधनच्या खात्यांवर शासनाने निर्बंध लादले. मात्र ग्रामीण भागात या खात्यात सरकारने पैसे जमा करण्यास सुरूवात केल्याचे पेव फुटले आहे. यामुळे ग्रामीण नागरिक स्टेट बँकेच्या शाखांमध्ये नवीन जनधन खाते उघडण्यासाठी गर्दी करीत आहेत. तथापि प्रशासनाने जनधन खात्यात सरकारने कुठलेही पैसे जमा केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या केंद्र शासन व रिझर्व्ह बँकेकडून सतत घोषणांचा पाऊस सुरू आहे. सतत निकषही बदलत आहे. यामुळे शासकीय स्तरावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आज घेतलेला निर्णय उद्या बदलत आहे. मात्र बदललेल्या निर्णयाची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे प्रत्येक घोषणेचा वाट्टेल तो अर्थ काढला जात आहे. यातूनच ग्रामीण भागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जनधन खात्यांमध्ये विविध शासकीय अनुदानाचे पैसे जमा करणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले होते. तसेच ज्या खात्यांमध्ये ८ नोव्हेंबरनंतर मोठ्या प्रमाणात पैसे जमा होतील, त्याची चौकशी होईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मात्र दुसऱ्या भाषणात त्यांनी जनधनमधील जमा पैशांचे फिक्स डिपॉझिट करण्याचे निर्देश दिले. तसेच ८ नोव्हेंबरनंतर या खात्यात जमा झालेले पैसे, खातेधारकांनाच मिळतील याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले. या दोन वाक्यांचा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामस्थ आपल्या सोयीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. आता सरकारच खातेधारकांच्या खात्यात पैसे टाकत असल्याची अफवा गावागावांत पसरली आहे. काही खात्यात ज्याप्रमाणे अचानक कोट्यवधी रूपये जमा झाले, तसाच आपल्या खात्याचाही नंबर लागू शकतो, अशी शक्यता अनेकांना वाटत आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या ग्रामीण शाखांमध्ये खाते उघडण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी उसळत आहे. अनेक गावांमध्ये महिला बचत गटांची संख्या मोठी आहे. या बचत गटांच्या महिलांची दिशाभूल करण्याचे कामही गाव पातळीवर सुरू आहे. काही महिलांनी गावांमध्ये फिरून महिला बचत गटांचे जनधन खात्यांचे बँक अकाउंट नंबर व झेरॉक्स गोळा केल्या. त्यावेळी त्यांना या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे पैसे कशाचे असतील, ते कोण टाकतील, याची माहिती दिली नाही. बाजूच्या गावात जनधनच्या खात्यात पैसे आले आहेत, तुम्ही तुमचे खाते पाहून घ्या, असे महिलांना सांगितले जात आहे. यामुळे पैसे आले का म्हणून महिला बँकांमध्ये धडकत आहे. साहेब, १० हजार रूपये द्या जनधन खातेधारकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर पाच हजार रूपये काढता येतात. केवायसी पूर्ण असेल, तर महिन्याला १० हजार काढता येतील, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या. ज्या खातेधारकांच्या खात्यात पैसे असतील अशांसाठीच हा नियम आहे. तथापि काही नागरिक खात्यात पैसे नसतानाही महिन्याला १० हजार रूपये भेटणार असल्याचे सांगून बँकेत धडकत आहे. ते कर्मचारी व व्यवस्थापकांना भंडावून सोडत आहे.
जनधनमध्ये पैसे जमा झाल्याचे फुटले पेव
By admin | Updated: December 28, 2016 00:15 IST