राज ठाकरे यांची जादू : वणी परिसरातील समस्यांची जाण, कोळसा खाणींच्या समस्याही अवगतवणी : ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’, अशी मराठीत एक एक म्हण आहे. त्याची प्रचिती बुधवारी वणीत आली. निमित्त होते, राज ठाकरे यांच्या सभेचे. अवघ्या २५ मिनिटांत त्यांनी या मतदार संघातील समस्यांची जंत्री सादर करून त्यांना या मतदार संघाची किती माहिती आहे, याचे प्रत्यंतर आणून दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्रात फर्डे वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी नेहमीच गर्दीही होते. मागीलवेळी ते वणीत आले होते. मात्र त्यांनी केवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. थेट जनतेशी त्यांनी त्यावेळी संवाद साधला नव्हता. त्यामुळे वणीकरांच्या मनात हूरहूर होती. त्यांचे भाषण ऐकण्यास न मिळाल्याने त्यावेळी जनता हिरमुसली होती. ती हूरहूर आणि हिरमुसलेली जनता आज त्यांच्या २५ मिनीटांच्या भाषणाने हुरळून गेली. अवघ्या २५ मिनीटांत त्यांनी येथील जनतेची मने जिंकली. १२ वाजून ४ मिनीटांनी त्यांचे आगमन झाले अन् १२ वाजून ७ मिनीटांनी त्यांचे भाषण सुरू झाले. अवघे २५ मिनीट म्हणजे १२ वाजून ३२ मिनीटांपर्यंत ते बोलत होते अन् उपस्थित जनता टक लावून केवळ ऐकत होती.येथील शासकीय मैदानावर आयोजित सभेत बोलताना त्यांनी या परिसरातील प्रदूषण, आरोग्य, रस्ते, वीज आदी समस्यांचा खरपूस समाचार घेतला. गेल्या ६0 वर्षांत जनतेला या सुविधा देऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेतले. वणीचा ‘ब्लॅक डायमंड सिटी’, असा होत असलेला उल्लेख करून त्यांनी यवतमाळपासून ते वणीपर्यंतचा रस्ता कसा खाचखळग्यांनीच भरला होता, हे कथन केले. या रस्त्यामुळेच आपल्या शरीरात किती हाडे आहेत, याची जाणीव झाल्याचेही त्यांनी त्यांनी सांगून टाकले. कोळसा खाणींमुळे या परिसरातील जनतेला आजारांची कशी देणगी मिळाली, हे सांगून त्यांनी या परिसरातील समस्यांची आपल्याला जाण असल्याचे अधोरेखित केले. प्रदूषणामुळे आरोग्यावरील खर्च वाढल्याने जनता कर्जबाजारी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या सुरू असलेल्या युती आणि आघाडी तुटण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी भाष्य केले. कोण कोणत्या पक्षात आहे, हेच कळेनासे झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व चित्र बदलण्यासाठीच आता मनसेने कंबर कसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी उपस्थितांनीही प्रचंड टाळ्या वाजवून त्यांच्या बोलण्याला एकप्रकारे सहमती दर्शविली. अवघ्या २५ मिनीटांत त्यांनी विविध मुद्दे, देश व राज्य पातळीवरील तसेच मतदार संघातील समस्यांचा उहापोह केला. यावरून त्यांना समस्यांची जाण असल्याचेही दिसून आले. वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील ग्रामस्थाही त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळी विविध वाहनांनी वणीत आले होते. मात्र सभास्थळी कुठेही गडबड झाली नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (कार्यालय प्रतिनिधी)
२५ मिनिटांत जिंकली सर्वांची मने
By admin | Updated: October 1, 2014 23:31 IST