गुन्ह्यांची जुळवाजुळव : पोलीस लागले कामाला, अटकेचे आव्हानलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध गुन्हे शिरावर असलेल्या अक्षय राठोड टोळीच्या सदस्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनात सुरू आहे. त्यासंबंधीच्या प्रस्तावासाठी लागणाऱ्या अक्षयविरोधातील गुन्ह्यांची जुळवाजुळवही केली जात आहे. गुरुवार, १५ जून रोजी मुंबईत पोलीस महासंचालकांनी उघडकीस न आलेल्या राज्यभरातील गुन्ह्यांचा पोलीस आयुक्त व महानिरीक्षकांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीला जाण्यापूर्वी अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांना यवतमाळातून अक्षय राठोड टोळीवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लावला जाणार असल्याची सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे महानिरीक्षक कार्यालयही आता ‘मोक्का’च्या या प्रस्तावाची प्रतीक्षा करू लागले आहे. अक्षय राठोड व त्याच्या टोळीतील सदस्यांवर अनेक गुन्हे आहेत. अलिकडेच रेतीघाटातील वाहनाच्या व्यवहारावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या प्रकरणात अक्षय राठोड फरार आहे. त्याने पोलिसांना ‘आपली अटक करून दाखवा, फायरिंगच करतो’, अशा शब्दात खुले आव्हान दिल्याची माहिती आहे. त्यानंतरही पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून अक्षयचा शोध घेत आहे. पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर आहेत. त्याच्या एका साथीदाराने पोलिसांच्या मारहाणीच्या भीतीने नुकतेच नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आता यवतमाळ पोलिसांना त्याला प्रोड्युस वॉरंटवर ताब्यात घ्यावे लागणार आहे. लवकरच अक्षयलाही अटक करू, असा दावा पोलीस दलातील डिटेक्शनमध्ये एक्सपर्ट कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. अक्षयच्या शोधात पोलिसांचे मालमत्ता व शरीरासंबंधीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांचे तपास मागे पडल्याचे सांगितले जाते. अक्षयवर गंभीर गुन्हे दाखल असले तरी त्याच्या टोळीत बहुतांश मराठी भाषिक युवकांचा समावेश आहे. प्रवीण दिवटेच्या खुनानंतर अक्षय राठोडकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहिले जात आहे. हीच पोलीस यंत्रणेसाठी चिंतेची बाब आहे. या सहानुभूतीच्या बळावर अक्षय मोठा झाल्यास आणखी एक टोळी स्ट्राँग होण्याची, त्यातून संघटित गुन्हेगारी वाढीला लागण्याची व पर्यायाने डोकेदुखी वाढण्याची भीती पोलीस यंत्रणेला आहे. अक्षय राठोड टोळीविरुद्ध स्ट्राँग ‘मोक्का’चा प्रस्ताव बनविला जात आहे. तो महानिरीक्षकांमार्फत मंजुरीसाठी मुंबईला महासंचालक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. ‘मोक्का’अंतर्गत या टोळीला कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा प्रयत्न आहे. ‘मोक्का’चा हा प्रस्ताव कायद्याच्या कसोटीत किती काळ टिकतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. अक्षय राठोडच्या गुन्हेगारी कारवायांना लगाम लावण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला राजकीय दबावाची झालर लागल्याने पोलिसांच्या या प्रयत्नांकडे साशंकतेने पाहिले जात आहे. सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर राजकीय दबावप्रवीण दिवटेच्या खुनानंतर अक्षय राठोडच्या निमित्ताने यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळातील दुसऱ्या गटाविरुद्ध अचानक आव्हान उभे झाले. प्रवीणची जागा अक्षय भरून काढतो की काय, अशी हूरहूर या दुसऱ्या गटाला आहे. म्हणूनच या दुसऱ्या गटाने अक्षयची टोळी उभी राहण्यापूर्वीच संपविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालविली असल्याची पोलीस वर्तुळातील माहिती आहे. या दुसऱ्या गटाला सत्ताधारी नेत्यांचे खुले राजकीय पाठबळ आहे. त्या बळावरच अक्षयच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न होतो आहे. अक्षयच्या अटकेसाठी प्रचंड राजकीय दबाव वाढल्याने पोलीस यंत्रणेने चोऱ्या-घरफोड्यांचे तपास सोडून केवळ अक्षयचे लोकेशन काढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तशा सूचनाच त्यांना मिळाल्याचेही बोलले जाते. अक्षयला अटक करायची, विविध मार्गाने त्याला घेरायचे आणि अधिकाधिक काळ कारागृहात ठेवायचे, असा दुसऱ्या टोळीचा मनसुबा आहे. राजकीय पाठबळ व ‘मोक्का’ची सुरू असलेली तयारी पाहता प्रशासनाच्या साथीने हा मनसुबा यशस्वी होण्याची शक्यता पोलीस वर्तुळातील चर्चेतून व्यक्त केली जात आहे.
अक्षय राठोड टोळीवर ‘मोक्का’ची तयारी
By admin | Updated: June 16, 2017 01:41 IST