जिल्हाधिकारी : भ्रमणध्वनीवर माहिती कळविण्याचे आवाहनयवतमाळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध उत्खनन करून साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. असा साठा करणे गैरकायदेशीर आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या जमिनीवर असा साठा आढळून येईल, त्या व्यक्तीविरुध्द फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. रेतीघाटाच्या लिलावानंतर कंत्राटदारास घाटाच्या ठिकाणीच रेती काढून साठा करता येवू शकतो. अन्य ठिकाणी अशा प्रकारचा साठा करता येत नाही. शासकीय, निमशासकीय, खासगी अथवा अन्य कोणत्याही जागेवर रेती साठवणूक करणे गैरकायदेशीर आहे. ज्या व्यक्तीच्या जमिनीवर हा साठा आहे, त्या व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन तसेच महाराष्ट्र जमीन अधिनियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच दंडात्मक कार्यवाहीचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.रेतीच्या अवैध साठ्याची माहिती नागरिकांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्यापैकी कोणालाही कळवावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या ९४२१७८२१३० किंवा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या ८८८८८३७००३ या क्रमांकावर कळविण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना अवैध रेती साठ्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहते. संबंधित तलाठ्यांनी साठवणूक केलेल्या रेतीबाबत तहसीलदारास लेखी माहिती न दिल्यास त्यांच्याविरुध्दही प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. (वार्ताहर)
रेती साठवणूकप्रकरणी जागेचा मालक व तलाठ्यांवरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2015 02:09 IST