लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस सोयाबीन बियाण्यांच्या सावटात जिल्ह्यातील खरिपाच्या ९७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. बियाणे बोगस निघाल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे खरेदी करावे लागले.जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या सहा हजारांवर तक्रारी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलवून दिले आहे. मात्र पाच हजार शेतकरी पंचनामे होऊनही अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कंपन्यांकडून तत्काळ बियाणे बदलवून देण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे पाहून अखेर काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले तर काहींना नाईलाजाने कृषी केंद्रांमधून उधारीवर बियाणे दुबार पेरणीसाठी घ्यावे लागले. कृषी केंद्रांनीही मग आपल्याकडून पडून असलेल्या बियाण्यांच्या बॅग उधारीत शेतकऱ्यांच्या माथी मारल्या. आता हे बियाणेसुद्धा उगवते की नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. आतापर्यंत ९७ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. आणखी तीन टक्के पेरण्या बाकीच आहेत. कदाचित बियाणे कंपन्यांकडून सोयाबीनचे बियाणे बदलवून मिळेल या प्रतीक्षेत हे तीन टक्के शेतकरी थांबले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यांचा चांगलाच फटका बसला. जेवढ्या तक्रारी दाखल झाल्या त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यवतमाळातील ठोक बियाणे विक्रेत्यांनी सुरुवातीला कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने सोयाबीन बियाणे विकले तर येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे दुसऱ्या जिल्ह्यात परस्परच विकले गेले. ठोक विक्रेत्यांनी निर्माण केलेल्या कृत्रिम टंचाईपासूनच जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला जणू ग्रहण लागले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीसाठी बियाणे कंपन्यांसोबतच यवतमाळातील ठोक विक्रेते आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकरी दोषी मानत आहे.यवतमाळच्या हक्काचा १५०० मेट्रिक टन युरिया पुन्हा पळविलायवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा १४०० मेट्रिक टन युरिया नांदेड व धामणगावच्या रॅक पॉईंटवरून पळविल्याचे उदाहरण ताजे असताना शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. धामणगावच्या रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्यासाठी २४०० मेट्रिक टन युरिया आला होता. परंतु त्यातील एक हजार मेट्रिक टन अमरावतीने तर ५०० मेट्रिक टन युरिया वर्धेने रॅक पॉईंटवरूनच पळविला. यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला अवघा ९०० मेट्रिक टन युरिया आला. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा युरियासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या ९७ टक्के पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST
जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या सहा हजारांवर तक्रारी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलवून दिले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या ९७ टक्के पेरण्या
ठळक मुद्देबोगस सोयाबीन बियाण्यांचा हजारो शेतकऱ्यांना फटका, दुबार पेरणीसाठी उधारीवर आणले बियाणे