यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील ७३ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्यच नाही. येथे केवळ शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. ही बाब अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गांभीर्याने घेतली असून यासाठी पाच जिल्ह्यातून विद्यापीठावर धडक मोर्चा नेण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्राचार्य श्रीकांत परबत यांनी पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात मूलभूत सोईसुविधा मिळत नाही. विद्यापीठ स्तरावर पेपरचे योग्य मूल्यमापन केले जात नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता येते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. तासिका प्राध्यापकांकडून बरेचदा पेपर तपासण्यात येतात ही बाब चुकीची आहे. महाविद्यालयाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी तेथे पूर्णवेळ प्राचार्य असणे आवश्यक आहे. यासह अनेक समस्यांच्या निराकरणासाठी ३० सप्टेंबरला विद्यार्थी परिषद मोर्चा काढीत आहे. जनजागृती मोहीम म्हणून १ सप्टेंबर रोजी महाविद्यालय बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान विविध आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थी जागृती मोहीम राबविली जाणार आहे. ११ सप्टेंबरला खोट्या आश्वासन देणाऱ्या महाविद्यालयांची काळी पत्रिका काढण्यात येणार आहे, असे प्रदेशमंत्री विक्रमजित कलाने यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रदेशसह विद्यार्थिनी प्रमुख मंजूषा खर्चे, नगरमंत्री संकेत कोल्हे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
७३ महाविद्यालयांना प्राचार्यच नाही
By admin | Updated: August 31, 2014 00:07 IST