नेर : येथील क्रीडा संकुलाच्या सभागृहात तालुकास्तरीय समाधान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ७०० तक्रारी निकाली काढण्यात आल्या. सर्वाधिक तक्रारी पंचायत समिती अंतर्गत विभागाच्या होत्या. घरकूल, सिंचन विहीर, शौचालय, दारिद्र्य रेषेच्या यादीत समावेश आदी तक्रारींचा यात समावेश होता. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. समाधान शिबिरात नागरिक मोठ्या अपेक्षेने तक्रारी दाखल करतात. यावर वेळेत व सकारात्मक कार्यवाही होणे आवश्यक आहे. काही विभागाकडून वेळेत कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. कालमर्यादेत कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करावा. अन्यथा संबंधितांवर कार्यवाही करावी लागेल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, पंचायत समिती सभापती भरत मसराम, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी अभियंता रमेश होतवाणी, कुलदीप रामटेके, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विनय ठमके, तहसीलदार शरयू आढे यांच्यासह विविध विभागाचे तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. कर्जास पात्र शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना तातडीने कर्ज वितरीत केले जावे. ‘बीएसएनएल’ने दुरध्वनी केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले आहे. यामुळे नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. खड्डे बुजविले नसल्यास बीएसएनएलच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. (तालुका प्रतिनिधी)
नेर येथे शिबिरात ७०० तक्रारदारांचे समाधान
By admin | Updated: October 18, 2015 02:49 IST