यावर्षीची टक्केवारी ३७ : मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे प्रयत्न व नियमित बैठकांमुळे जिल्ह्यात २७ जुनपर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप झाले आहे. या दिवसांपर्यंत एकूण ६२८ कोटी रुपयांचे वितरण झाले असून वितरणाची ही टक्केवारी ३७ टक्के आहे. गेल्यावर्षी या दिवसापर्यंत वाटपाची ही टक्केवारी केवळ २३ टक्के इतकीच होती. जिल्हाधिकारी संचिद्र प्रताप सिंह येथे रुजू झाल्यानंतर पीककर्ज वाटपाचा विषय प्राधान्याने हाती घेतला. गेल्या हंगामात दुष्काळ राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाची काळजी लागली होती. बँकांनीही आखडता हात घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी बॅकांची ही मानसिकता ओळखून दर आठवड्याला बैठक घेण्याचे धोरण अवलंबविले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सर्व शाखांच्या व्यवस्थापकांची पहिल्यांदाच बैठक घेण्यात आली. जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीसह सर्व शाखा व्यवस्थापकांची प्रत्येकी तीनदा बैठक झाल्याने पिककर्ज वाटपास गती आली.गेल्यावर्षी संपूर्ण वर्षात केवळ ५२ टक्के पिककर्ज वाटप झाले होते. तर गेल्यावर्षी २७ जूनपर्यंत कर्ज वाटपाची ही टक्केवारी केवळ २२ टक्के इतकी होती. या तुलनेत यावर्षी पिककर्ज वाटपाची टक्केवारी ३७ टक्के इतकी आहे. गेल्या संपूर्ण वर्षात एक लाख २३ हजार शेतकऱ्यांना ९२२ कोटी रुपयांच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र परवापर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना ६२८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या दोन दिवसात यात आणखी २५ कोटीच्या वाटपाची भर पडली असल्याची शक्यता असून २९ जूनपर्यंत ४० टक्केच्या आसपास पीककर्ज वाटप झाले असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जामध्ये काही राष्ट्रीयकृत बँकांनी कमालीचे कर्ज वाटप केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात पंजाब नॅशनल बँक ६२ टक्के, आयसीआयसीआय बँक ८४ टक्के, विजया बँक ६८ टक्के, इंडियन बँक ४७ टक्के, इंडियन ओवसिज बँक ४३ टक्के, एक्सीस बँक ७९ टक्के तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४१ टक्के इतके कर्ज वाटप केले आहे. (प्रतिनिधी)
८७ हजार शेतकऱ्यांना ६२८ कोटी पीक कर्ज वाटप
By admin | Updated: July 1, 2015 00:19 IST