यवतमाळ : एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विदर्भातील यवतमाळसह अमरावती, वर्धा, वाशिम आदी जिल्ह्यातील ६१ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्राम संशोधन केंद्रातर्फे माहिती, शिक्षण व संवादासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेतीविषयक कार्यक्रम नियमितपणे घेण्यात येतात. शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा व सामाजिक कार्याचा गौरव टाटा नॅशनल व्हच्युअॅल अकॅडमीच्यावतीने नऊ वर्षांपासून सन्मानित करण्यात येते. यावर्षी विदर्भातील ६१ शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी भारतासह परदेशातील २३७ व्यक्तींचा यामध्ये समावेश होता. हा कार्यक्रम चेन्नई येथील एम.एस. स्वामीनाथन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय परिडा, डॉ.शैलेश नायक, डॉ.बशिर अली यांच्या उपस्थितीत पार पडला. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या महिला सशक्तीकरण परियोजना प्रकल्पातील सर्वाधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.या कार्यक्रमासाठी अमरावतीचे प्रकल्प सहायक विलास सवाने, यवतमाळचे शास्त्रज्ञ सचिन मातळे, वर्ध्याचे नीलेश पाटकर, राळेगावच्या प्रकल्प सहाय्यक नलिनी शंभरकर आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
विदर्भातील ६१ शेतकऱ्यांना केले पुरस्कृत
By admin | Updated: February 11, 2015 00:08 IST