उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम असून माजी आमदारासह गावकर्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर उमरखेडच्या तहसीलदारांनी संबंधित उपअभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविला आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीतीरावरील ५४ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडवावे या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. शेवटी इसापूर धरणातून पाच दशलक्ष पाणी सोडण्याचा निर्णय झाला. पाणी सोडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात टंचाईग्रस्त गावापर्यंंत पाणी पोहोचलेच नाही. पाणीटंचाईसंदर्भात परिस्थिती पाहून आमदार विजय खडसे व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या प्रयत्नाला खो देत प्रकल्पाच्या उपविभाग क्र. १ चे उपअभियंत्याच्या चुकीच्या नियोजनाने ३.१५ टीसीएम पाणी टंचाईग्रस्तांना मिळाले नाही. याबाबत आमदार खडसे यांनी चांगलीच कान उघाडणी केली. तर तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविला आहे. पाच दशलक्ष घनमीटर पाणी पात्रात सोडण्यासंबंधी जिल्हाधिकार्यांकडून आदेश आला होता. त्यानुसार भीषण पाणीटंचाई असणार्या लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड, पेंदा, बिटरगाव, सावळेश्वर, पिंपळगाव, लोहरा, देवसरी, चातारी, संगम चिंचोलीसह अनेक गावांना पाणी कसे द्यायचे याचा आराखडा तहसीलदार शेजाळ यांनी उध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या अभियंत्याला दिला. परंतु त्यांनी ३.१५ टीसीएम पाण्याचा अपव्यय केला. यासंदर्भात दत्तराव शिंदे, भीकू जाधव, डॉ. भगवान देवसरकर, प्रेमराव वानखडे, चक्रधर देवसरकर, शिवाजी वानखडे यांच्यासह अनेकांनी संबंधित अधिकार्याच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. तर उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी चुकीचे काम करणार्या उपअभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या विरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. नियोजनशून्यतेमुळे पैनगंगा तीरावरील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात तीव्र असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)
पैनगंगेच्या काठावरील ५४ गावे तहानलेली
By admin | Updated: May 25, 2014 00:00 IST