पुसद : तालुक्यातील ई-क्लास गायरान शासकीय जमिनीवर असलेले शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे यासाठी तब्बल ४२ गावातील शेकडो महिला-पुरुषांनी येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. यासंदर्भात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे.पुसद तालुक्यातील जवळपास ४२ गावांमध्ये १९८० पासून ई-क्लास गायरान शासकीय जमिनीवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबतचा शासकीय दंड भरण्यात आला असूनही सदर जमिनीचे पट्टे नियमित करण्यात आले नाही. या गायरान जमिनीवर शेतकऱ्यांनी झाडे झुडूपे साफ करून जमीन वहितीखाली आणली आहे. याच जमिनीवर अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. या प्रकरणी सर्व ४२ गावातील शेतकऱ्यांनी १६ आॅगस्ट २०१४ रोजी मोर्चा काढून अतिक्रमण नियमित करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावेळी तहसीलदार भगवान कांबळे यांनी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ठराव मागणी करून शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला. या उपोषणात हिंगणी, रोहडा, गोपवाडी, कुंभारी, बिबी, कृष्णनगर, हिवळणी, वनवार्ला, खडकदरी, मोखाड, पाळोदी आदी गावातून नागरिक सहभागी झाले आहे. (प्रतिनिधी)
पुसदमध्ये ४२ गावातील नागरिकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 01:16 IST