तापमान व उकाड्याचा कहर : शेतकऱ्यांना बियाण्यांचा संशय लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांना बियाणेच सदोष असल्याचा संशय येत असून कृषी विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. सर्वाधिक महागडे पीक म्हणून भुईमूुगाकडे बघितले जाते. ओलिताची सोय असणारे शेतकरी उनहाळ्यात भुईमूगाची लागवड करतात. यावर्षी मुबलक पाणी आणि अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड केली. दरवर्षी साधारणत: आठ ते दहा हजार हेक्टरवर होणारी भूईमुगाची लागवड यावर्षी तब्बल ४० हजार हेक्टरवर पोहोचली. यामुळे जिल्ह्यात चांगले उत्पादन हाईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात शेंगांची काढणी करताना झाडाला शेंगाच नसल्याचे दिसून आले. यामुळे शेतकरी अवाक झाले. ज्या झाडाला किमान १५ ते २० शेंगा पकडणे अपेक्षित होते, त्याला केवळ एक ते दोनच शेंगा लागल्या. परिणामी शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड झाले. अनेक झाडांना एकही शेंग न लागणे, कमी शेंगा लागणे, दाणे परिपक्व न होणे, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी दररोज वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बियाण्याबाबतच संशय व्यक्त केला. खासगी आणि शासकीय बियाणे कंपन्याच्या बियाण्यांचा यात समावेश आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाचे पथक दाखल शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत संशय व्यक्त करताच त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राचे पथक विविध भागात तपासणी करीत आहे. नेमक्या कशामुळे शेंगांची संख्या घटली, याचा हे पथक शोध घेत आहे. वाढलेल्या तापमानाने फूलगळ भुईमूगाची लागवड २५ जानेवारीपर्यंत करणे अपेक्षित असते. तथापि १५ फेब्रुवारीपर्यंत लागवड करता येते, असे खासगी बियाणे कंपन्या सांगतात. यामुळे शेतकऱ्यांनी १५ फेबु्रवारीपर्यंत लागवड केली. मार्च महिन्यात पीक फुलावर होते. हे पीक ३० अंशापर्यंतचे तापमान सहन करू शकते. प्रत्यक्षात तापमान ३५ अंशाच्यावर गेले. यामुळे फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका शेंगांना बसला आहे.
४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला बसला फटका
By admin | Updated: June 3, 2017 00:45 IST