महाराष्ट्रात सर्वाधिक : शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आॅनलाईन जमायवतमाळ : सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आॅनलाईन जमा केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार ९०६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शासनाने गतवर्षी राबविली. पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून राबविलेल्या या योजनेच्या रकमेला काही दिवसांपूर्वीच मंजूरी मिळाली. प्रत्यक्षात रक्कम उपलब्ध झाली नव्हती. आता प्राप्त झालेल्या रकमेतून संबंधित शेतकऱ्यांना वितरण केले जात आहे. मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांसाठी योजनेचा लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील २९ हजार ७४९ शेतकऱ्यांना ९ कोटी ५२ लाख ८४० रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्या खालोखाल महागाव तालुक्याच्या १६ हजार १२ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख ५८ हजार ८९१ रुपयांचे वाटप होणार आहे. दारव्हा तालुक्यातील १४ हजार ८५८ शेतकऱ्यांना ३ कोटी ८१ लाख ७५ हजार ९०४ तर आर्णी तालुक्यातील ११ हजार २४ शेतकऱ्यांना ७ कोटी २२ लाख १६ हजार ३८३ रुपयांचे वाटप होणार आहे.यवतमाळ तालुक्यातील ३ हजार ७३, कळंब ५ हजार २४१, राळेगाव ३ हजार ५७७, घाटंजी ४५५, नेर ५८१, बाभूळगाव ३ हजार ३९९, पुसद २ हजार ५१५, दिग्रस १ हजार ४१, पांढरकवडा ३ हजार ९०५, वणी १३२, मारेगाव २६४ आणि झरीजामणी तालुक्यातील २ हजार ८० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीक विम्याचा सर्वाधिक लाभ घेणारे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. ७३ हजार ४३८ शेतकऱ्यांना या पिकाचा विमा मिळणार आहे. त्या खालोखाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ७३३ एवढी आहे, अशी माहिती येथील विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. (वार्ताहर)
पीक विम्याचे ३५ कोटी मिळाले
By admin | Updated: September 9, 2014 00:39 IST