योजना ठप्प : पंचायत समितीचा रामभरोसे कारभारमहागाव : येथील पंचायत समितीचा कारभार रामभरोसे चालू असून, तालुक्यात ३०० सिंचन विहिरींचे काम रखडले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्ण असून, विविध योजनाही ठप्प पडल्या आहे. महागाव पंचायत समितीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. तालुक्यात पाचही जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहे. याचा जिल्हा परिषदेत फायदा होईल, अशी खात्री नागरिकांना होती. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु दोन्ही ठिकाणच्या सत्तेचा सर्वसामान्यांना मात्र कोणताही फायदा होत नाही. जिल्हा परिषद आणि सत्ताधाऱ्यांनी महगाव पंचायत समितीला जणू वाळीत टाकल्याचे दिसत आहे. पंचायत समितीत दोन कृषी अधिकाऱ्यांची पदे आहेत. एक कृषी अधिकारी गेल्या कित्येक दिवसांपासून पंचायत समितीकडे फिरकलेच नाही. त्यामुळे कृषी आणि विशेष घटक योजनांचा गाभाच गळून गेला आहे. एक पद रिक्त आहे. तत्कालिन गटविकास अधिकारी हेमंत सहारे यांनी १२०० सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजुरात दिली होती. त्यांच्या अचानक बदलीमुळे नव्याने आलेले गटविकास अधिकारी राहुल शेळके काम गतिमान करतील अशी आशा होती. परंतु शेळके यांनी अल्पावधीत आपली पत घालविली. स्थानिक प्रशासनावर शेळके यांची पकड ढिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे. ३०० वैयक्तिक सिंचन विहिरी, २०० वैयक्ति शौचालय आणि एमआरइजीएसची कामे ठप्प पडली आहे. पंचायत समितीअंतर्गत ३४ गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक कुटुंब स्थलांतरणाच्या वाटेवर आहे. वैयक्तिक योजनांचा लाभ मिळत नाही. कोणत्याही मुख्यालयात ग्रामसेवक सापडत नाही. गटविकास अधिकाऱ्यांचा कक्षही नेहमी बंद असतो. नागरिकांना पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागते. अशा परिस्थितीत सिंचन विहिरी पूर्ण कशा होतील, असा प्रश्न आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
महागावात ३०० सिंचन विहिरींचे काम रखडले
By admin | Updated: May 1, 2016 02:34 IST